महापुरुषांबद्दलचे वक्तव्य करणा-यांविरोधात आता कायदा : उदयनराजे भोसले
सातारा : प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांबद्दल ब-याचदा वादग्रस्त विधाने करून त्यांचा वेळोवेळी अवमान केला जात आहे. अलिकडे अभिनेते राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांनी अशीच वादग्रस्त विधाने करून शिवरायांचा अवमान केला. याबद्दल गुन्हा दाखल झाला. कारवाईही सुरू आहे. परंतु असे महापुरुषांबद्दल वक्तव्य करणा-यांना धडा शिकविण्यासाठी कायदा केला जावा, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन केली होती. त्यामुळे यासंदर्भात लवकरच कायदा होऊ शकतो. स्वत: गृहमंत्री अमित शाह यासंबंधीची घोषणा करू शकतात, असे खा. उदयनराजे भोसले म्हणाले.
राज्यात गेल्या काही महिन्यांत महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव केल्यावरुन राज्यभर संतापाची लाट पसरली होती. अभिनेता राहुल सोलापूरकर आणि तथाकथीत पत्रकार प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्यानंतर शिवभक्तांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर, या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशांत कोरटकर सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी छत्रपती घराण्यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती आणि अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी यासंदर्भात कायदा करावा, अशी मागणी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणाऱ्या अवमानावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार आक्षेपार्ह विधाने केली जातात, या मुद्यांवर बोलताना सरकार काय बोळ्याने दूध पितं का? असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एक विशेष अधिवेशन बोलवावे आणि तात्काळ कायदा पारित करावा, अशी मागणी केली होती. तत्पू्र्वी गृहमंत्री अमित शाह यांचीही त्यांनी भेट घेतली होती. आता, याबाबत त्यांनी माहिती देत रायगडावरुन या कायद्याची घोषणा होऊ शकते, असे म्हटले आहे.
अमित शाह १२ तारखेला
रायगडावर हजेरी लावणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या महिन्यात १२ तारखेला येणार आहेत. यावेळी कायद्याची घोषणा होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती, त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळे महत्व प्राप्त होईल, असे उदयनराजे भोसले म्हणाले.