वसंताच्या आगमनाने मोहरणारा आसमंत चैत्रपालवीने शुभशकुनांचे बांधलेले तोरण असा सगळा निसर्गच अवघ्या वातावरणाला एका वेगळ््या श्रीमंतीचा थाट बहाल करतो. चैत्र पाडवा म्हणजेच नव्या वर्षाच्या स्वागताचा दिवस आणि खरे तर विश्वासाने नव्या मार्गक्रमणाचा आत्मविश्वास देणारा हा दिवस संस्कृतीच्या चिरंतन पाऊलखुणांचे परंपरागत आश्वासन आहे. हिंदू संस्कृतीच्या कालगणनेचा हा पहिला दिवस जरी असला तरी त्याचा सृष्टीशी असलेला संबंध एक नवी दृष्टी देणारा आहे, ही बाब नाकारता येत नाही. या दिवसापासून शालिवाहन शक किंवा विक्रम संवत्सर याचीही सुरवात होते. विक्रमादित्याने आपल्या राज्यामध्ये सुखसमृद्धी निर्माण केली आणि स्वत:कडे असलेली रक्कम ही राजकोषाला अर्पण केली. म्हणून त्याच्या नावाने लोकांनी स्वत: हे विक्रम संवत सुरु केले. प्रजेच्या सुखांमध्ये स्वत:चे सुख पाहणारी अशी ही राजकोषीय परंपरा ही भारतीय संस्कृतीची जगासाठी फार मोठी देणगी ठरते. म्हणूनच या दिवशी प्रत्येक जण एकमेकांच्या सुखसमृद्धीचे चिंतन करतो आणि मन:पूर्वक शुभेच्छा देत असतो.
शब्द आणि भावनांचा एक सुरेख आविष्कार म्हणजे शुभेच्छा असतात. त्यामध्ये इच्छेचे बळ जोडले जाते आणि एका सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. निर्मळ आणि निष्पाप मनाने दुस-याविषयी केलेले हे शुभचिंतन मनाला एका परमोच्च आनंदाचे दान देते आणि ही परमोच्चता व्यक्त करायची कशी तर मग आपल्याच दारासमोर कुठेतरी गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणारी नव्या को-या वस्त्राची गुढी उभारायची. मनाच्या उत्कठतेची उंची निश्चित वातावरणात एक मंगलमयता निर्माण करते.
गुढी उभारायची तर त्यामधून शुभेच्छा, मांगल्य याचे सर्वोच्च निदर्शक म्हणून ती उभारण्याची प्रथा पडली असावी. असे म्हणतात की याच दिवशी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला होता. हा आनंद केवळ टाळ््या वाजवून समाधान देऊ शकला नसता. कारण घराघरांमध्ये ओसंडून वाहणारा हा आनंद तरी प्रतीकांच्या निमित्ताने व्यक्त व्हावा ही जनमानसाची भावना गुढीच्या रूपाने आकाराला आली आणि आनंदाचे प्रतीक म्हणून त्याच गुढीपाडव्याचे निधान गौरवान्वित झाले.
आज सगळीकडे निघणा-या स्वागत यात्रा याच आनंदनिधानाला व्यक्त करीत असतात. नव्या वर्षाचे हे स्वागत आणि नव्या संकल्पांचा शुभारंभ असा हा शुभमुहूर्त लोकांसाठी शतकानुशतके प्रेरणा देणारा ठरत आला आहे. कदाचित या सगळ््या गोष्टींमुळेच जगातल्या सर्व संस्कृतीमध्येच भारतीय संस्कृती आपला वेगळेपणा टिकवू शकेल. तसेच विश्वाला एक नवा चेहरा देऊ शकला. नव्या मराठी वर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्या जाणा-या शुभेच्छा किंवा व्यक्त होणारा आनंद हा भविष्याचा वेध घेणारा आणि त्यासाठी लागणा-या आत्मविश्वासाशी निगडित असतो. जीवनातल्या प्रवासातला पुढचा प्रवास अधिक निर्धारपूर्वक करण्याचा संकल्प पाडव्याच्या निमित्ताने साकारला जात असतो. याच विचारांचा वसा तुम्हा आम्हाला जपायचा असतो. तसेच त्याला पुढच्या पिढीत संक्रमीत करायचा असतो.
प्रा. मधुकर चुटे, नागपूर
