बीड : जातींमधील दुरावा संपवून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम करावे लागेल. कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा. आपण लोकांना कसे वागायचे सांगतो, तेव्हा आपल्या अवतीभवती चुकीच्या प्रवृत्ती असता कामा नये. एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्त्वाला मोजावी लागते, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी बीड दौऱ्यावर आले होते. या दौ-यात त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या रोडमॅपबाबत सविस्तरपणे भाष्य केले. मी सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत काम केले. त्यामुळे मला सुदैवाने अनेक गोष्टींचा अनुभव आहे. माझ्या भागात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील लोकांच्या कामाच्या पद्धतीमध्ये फार तफावत आहे. मी इकडे आलो तेव्हा मला एका कार्यकर्त्याने, इकडे या पद्धतीने चालते, त्या पद्धतीने काम चालते, असे सांगितले. पण आपण सवय लावू, तसे घडते, असे सांगत बीड जिल्ह्यातील कार्यपद्धती बदलण्याचे संकेत दिले.
बीड जिल्ह्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. पुढच्या ट्रिपला मी कदाचित डीपीडीसीची बैठक घेऊन त्यावेळी बैठक होईल. पण सध्या मला योग्य वाटतात ती कामे मतदारसंघात मंजूर करायची आहेत. या कामांचा दर्जाही मला पाहायचा आहे. अनेकजण माझ्याकडे निधीसाठी येतात. दादा आम्हाला १० लाखांचा निधी द्या, म्हणतात. पण मी ई-टेंडर काढणार आहे, यामध्ये १५ लाखांपर्यंतच्या कामांना मंजुरी देणार असल्याचे पवार म्हणाले.
बीडला विमानतळ का झाले नाही?
आजपर्यंत अनेकांनी बीड जिल्ह्याचे नेतृत्व केले. बीडमध्ये एका विमानतळाची गरज आहे. दुर्दैवाने आतापर्यंत ते झाले नाही. बीडला जायचे असेल तर एक तर लातूरला उतरावें लागते किंवा नांदेड, छत्रपती संभाजीनगरला उतरुन यावे लागते. जिल्ह्यात विमानतळ असेल तर अधिकारी, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना यायला सोपे असतें, असे अजित पवार म्हणाले. बीडमध्ये रेल्वेचं काम किती वर्षे चाललं आहे, हा प्रश्न बीडकरांनी स्वत:ला विचारला पाहिजे. बीडमध्ये रेल्वे यायला इतका विलंब झाला, त्याला जबाबदार कोण? कोणीतरी याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
आता बीडचा विकास करणार
मी आता माझ्या एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. मंत्रालयातही सेक्रेटरी लेव्हलचा माणूस नेमला आहे. या माध्यमातून पाणी, वीज, बीडमधील राष्ट्रीय महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, विमानतळ यावर देखरेख ठेवली जात आहे. मी आता बीडमध्ये इनक्युबिशन आणि इनोव्हेशन सेंटर सुरु करण्याच्या विचारात आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात २०० कोटींची गुंतवणूक येईल. त्यापैकी १६५ कोटी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आणणार आहे, ३५ कोटी राज्य सरकारकडून आणण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे. या सेंटरमध्ये बीडमधील तरुण-तरुणींना नवीन प्रशिक्षण द्यायचे आहे. आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील संधी वाढल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.
