दोघे ताब्यात, बीड गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हा दाखल
बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असलेल्या कळंबमधील महिलेचा मृतदेह ४ दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या महिलेची हत्या केली असल्याचा आरोप केला होता. या घटनेची गंभीर दखल घेऊन बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावे आहेत. कळंब पोलिसांत या दोघांविरोधात पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथील असल्याची माहिती आहे. या हत्येच्या घटनेमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले असून, गुन्हा लपविण्याच्या दृष्टीने तर हे हत्याकांड घडवून आणले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणार असल्याचा आरोप झाला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे दाखवून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा डाव होता, असा दावा मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला होता. त्यामुळे या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरु असताना या महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली. अशातच बीड पोलिसांनी या महिलेचा मृतदेह कुजल्यामुळे घरातच शवविच्छेदन केले होते. त्यानंतर या महिलेचे अंत्यसंस्कारही झटपट उरकण्यात आले. या सगळ्यामुळे बीड पोलिसांभोवती पुन्हा एकदा संशयाचे धुके निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी महिलेच्या दोन मारकेऱ्यांना केलेली अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून महिलेच्या मृत्यूबाबत कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या डोक्याला मार लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
