युद्धामुळे वाढली चिंता, भारतीयांमध्ये विद्यार्थी संख्या मोठी
विमानतळे बंद असल्याने अडचण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इराण आणि इस्रायलमधील संघर्ष चौथ्या दिवशीही सुरू होता. सोमवारी इराणने सर्व परदेशी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले. जमिनी सीमा उघडण्यात आल्या आहेत. त्यामुळे विदेशी नागरिकांनी आपापल्या देशात परतावे, असे इराण सरकारने म्हटले. इराणमध्ये तब्बल १० हजार भारतीय आहेत. सध्या ते तेथे अडकले आहेत. त्यातच इराण-इस्रायलमध्ये संघर्ष पेटल्याने इराणमधील सर्व विमानतळ बंद ठेवली आहेत. त्यामुळे इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या विदेशी नागरिकांची अडचण झाली आहे.
इस्रायलने इराणमध्ये हल्ला केल्यानंतर भारतीय दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर अनेक मार्गांचाही शोध घेतला जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली. इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय आहेत. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
इस्रायलमध्ये इराणी हल्ल्यात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले. यापूर्वी रविवारी रात्री इस्रायली परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला केला. यामध्ये १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. शनिवारी इस्रायली सैन्यानेही इराणी संरक्षण मंत्रालयावर हल्ला केला. इराणमध्ये इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला तर १२७७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.