३३ जखमी, आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना
बंगळुरू : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या आयपीएल करंडक विजयी सेलिब्रेशनसाठी एन. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर तुफान गर्दी झाली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली तर ३३ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दी नियंत्रणातील त्रुटी कारणीभूत असल्याचा संशय आहे. पोलिस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करीत आहे.
स्टेडियमच्या बाहेर इतकी गर्दी होती की, लोक आत जाण्यासाठी भिंतीवरून उड्या मारत होते. काही जणांनी झाडावर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण याचा आता तपास केला जात आहे. पण बंगळुरुची ट्राफीक व्यवस्था व्यवस्थित असती तर कदाचित हा प्रकार टाळता आला असता. त्याचे कारण असे की सुरुवातीला आरसीबी टीम शहरात ओपन बसमधून परेड करणार होती. पण शहरातील वाहतूक कोंडीची स्थिती पाहता टाळण्यात आले. तसेच स्टेडियमच्या आतच कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु हा निर्णय घेऊनही चेंगराचेंगरी घडली. त्यामुळे ११ जणांचा नाहक बळी गेला.
पंजाब किंग्जला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ६ धावांनी पराभूत करत आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे विजेतेपद जिंकले. यानंतर बंगळुरुत काल रात्रीपासून विजयाचा जल्लोष करण्यात येत आहे. त्यानंतर आज सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी जल्लोष साजरा करण्यात येणार होता. मात्र, आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या देखील वाढू शकते.
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. परंतु त्यानंतर मैदानावर आरसीबीच्या विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान आयोजित केला होता. या सोहळ््याला उपस्थिती लावण्यासाठी मोफत आणि मर्यादित पासेससाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली होती. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेट क्रमांक ३ जवळ ही चेंगराचेंगरीची घटना घडली.
चेंगराचेंगरीची न्यायिक चौकशी
. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी लोकांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, असे सांगत मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. सरकार जखमींवर मोफत उपचार करणार आहे. आम्हाला या घटनेचे राजकारण करायचे नाही. मी या घटनेच्या न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहेत. १५ दिवसांत रिपोर्ट देण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. चेंगराचेंगरीची घटना दु:खदायक आहे. या घटनेमुळे विजयाचा आनंद संपला. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो, असेही सिद्धरामय्या म्हणाले.