मुंबई : प्रतिनिधी
आषाढी वारीमध्ये सहभागी होणा-या वारक-यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आषाढी वारीनिमित्त मानाच्या १० पालख्यांसोबत येणा-या ११०९ दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये अनुदान देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा शासन निर्णयही राज्य सरकारने जारी केला.
मागील वर्षी (२०२४) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणा-या प्रत्येक दिंडीला रु. २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निर्देश दिले होते. सन २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण ११०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.
त्यानुसार गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या १० पालख्यांसोबतच्या ११०९ दिंड्यांना प्रतिदिंडी रु. २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २,२१,८०,००० रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मानाच्या १० पालख्यांसोबतच्या ११०९ दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.
यासोबतच पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारक-यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे चरणसेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणा-या पालख्यांमध्ये सहभागी होणा-या वारक-यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’ करण्यासाठी सुमारे ५ हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे.