आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई!
मुंबई : प्रतिनिधी
बीसीसीआयने कोच गौतम गंभीरच्या जवळच्या सहकाºयांची पदावरून हकालपट्टी केली. या वर्षी आॅस्ट्रेलियात संपलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील खराब कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधून लीक झालेल्या गोष्टी लक्षात घेऊन बीसीसीआयने हे कठोर पाऊल उचलले. अभिषेक नायर व्यतिरिक्त क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांना संघातून काढून टाकण्यात आले. हे दोघेही ३ वर्षांहून अधिक काळ संघाशी जोडले होते. त्यामुळे नियमांनुसार आता त्यांच्या जागी नवीन भरती केली जाईल. आयपीएल २०२५ दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी कारवाई केली. त्यामुळे हा गंभीरला धक्का मानला जात आहे.
नायरच्या जागी कोणालाही नियुक्त केले जाणार नाही, कारण सीतांशु कोटक आधीच टीम इंडियाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडलेले आहेत. दिलीपचे काम सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्केट पाहतील. ट्रेनर सोहम देसाईची जागा एड्रियन ली रु घेईल, जो सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसोबत आहे. तो २००८ ते २०१९ पर्यंत केकेआर संघासोबत होता. त्याने २००२ ते २००३ पर्यंत टीम इंडियासोबतही काम केले. त्याने बीसीसीआयसोबत करार केला.
भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी १-३ ने गमावली. या मालिकेत अश्विनने अचानक निवृत्ती घेतली. रोहित शर्माने सिडनी कसोटीतून स्वत:ला बाहेर काढले होते, त्यानंतर संघात सर्व काही ठीक नसल्याची अटकळ बांधली जाऊ लागली. भारतीय ड्रेसिंग रूममधूनही बातम्या आल्या, ज्यामुळे हे प्रकरण आणखी तापले. एका सदस्याने बीसीसीआयकडे याबद्दल तक्रारही केली होती. याआधी टीम इंडियाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध लज्जास्पद कामगिरी केली होती. न्यूझीलंडने कसोटी मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला.
केंद्रीय करारातही होणार मोठे बदल
आयपीएल २०२५ च्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची बैठक झाली. यावेळी केंद्रीय कराराबद्दल सखोल चर्चा झाली. बैठकीनंतर दोन दिवसांनी, भारतीय महिला क्रिकेट संघाचे करार जाहीर करण्यात आले. पण पुरुष संघाचे करार अद्याप जाहीर झालेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार पुरुष संघाच्या केंद्रीय करारात मोठे बदल दिसून येऊ शकतात. यामुळे काही मोठी नावे वगळली जाऊ शकतात. त्याच वेळी आयपीएलनंतर इंग्लंड दौºयावर जाण्यापूर्वी बीसीसीआय केंद्रीय कराराची घोषणा करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.