भारताचे कठोर पाऊल, अड्डेही उद्ध्वस्त करणार
जम्मू : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काश्मीरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत कठोर धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे. आधी दोन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. त्यानंतर आणखी एका दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त केली. पुलवामा भागात एहसान उल हक शेख या दहशतवाद्याचे, कुलगाममध्ये झकीर अहमद गानियाचे तर शोपियाँमध्ये शाहीद अहमद कुटे या दहशतवाद्याचे घर पाडण्यात आले. शुक्रवारी रात्री १ वाजता दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून आक्रमक पाऊले उचलली जात आहेत. सोफियान येथील छोटीपूरा येथील लष्कर ए तोएबा या संघटनेत सक्रिय असलेल्या शाहिद अहमद कुट्टी याचे घर आयआयडी ब्लास्ट लावून उडवण्यात आले. शहिद हा मागील दोन वर्षापासून या संघटनेत सक्रिय असल्याची माहिती आहे. त्याचा भाऊही दोन वर्षापासून तुरूंगात असल्याची माहिती शेजाºयांनी दिली तर शाहिदचे वडील हे सध्या ताब्यात आहेत. तपास यंत्रणेचे अधिकारी काल शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास आले होते. कुटुंबीयांना ताब्यात घेतल्यानंतर रात्री १ च्या सुमारास या दहशतवाद्यांच्या घरी ब्लास्ट करून ते उद्ध्वस्त करण्यात आले.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काश्मीरच्या बांदिपोरा भागात कुलनार इथे चकमकीत एक दहशतवादी ठार मारण्यात आला तर दोन सैनिक जखमी झाले.
पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर पाच दहशतवादी हे पुन्हा पाकिस्तानात गेले असल्याची माहिती आहे. पाकिस्तानमधून पहलगाममध्ये येण्यासाठी या दहशतवाद्यांना सुमारे आठ तास लागले असावेत, अशी माहिती समोर आली तर परत जाण्यासाठी देखील जवळपास तेवढाच वेळ लागला असावा, असे सांगितले जात आहे.