‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून साहित्याचे संस्कार, ज्ञान आणि ज्ञानाची परंपरा आणि त्याचा अभिमान निर्माण होऊ शकतो
पुणे : लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्यासोबत इतिहास, कला, साहित्य व संस्कृतीची माहिती व्हावी; तसेच विविध प्रयोगशील उपक्रमांतून मुलांच्या मनोरंजनासोबत त्यांच्यामध्ये कल्पकता आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगर पालिका, पुणे पुस्तक महोत्सव संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच “पुणे बाल पुस्तक जत्रेचे” आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उदघाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ,यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा पुस्तक जत्रेचे संयोजक राजेशजी पांडे, मिलिंदजी मराठे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्याच्या दृष्टीकोनातून बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून साहित्याचे संस्कार, ज्ञान आणि ज्ञानाची परंपरा आणि त्याचा अभिमान निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, आपला थक्क करणारा इतिहास नीट मांडला गेला नसल्याने आपल्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. लहान मुलांची ग्रहण करण्याची क्षमता मोठी असल्याने हा इतिहास पोहोचवण्याचे मोठे माध्यम लहान मुले आहेत. जगातील पहिला शब्दकोश भारतात निर्माण झाला, पहिली शस्त्रक्रिया भारतात झाली, पहिले विद्यापीठ आपल्या इथे झाले. हे मुलांना समजले पाहिजे यासाठी छोट्या छोट्या पुस्तकांची निर्मिती झाली पाहिजे. भारतीय खेळ हे मुलांना जास्त निरोगी बनवत होते, जास्त एकाग्रता निर्माण करतात. कोल्हापूर येथे खेळघर संकल्पना राबविली जात आहे. खेळाच्या माध्यमातून बुद्धीचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो आणि वाचायची सवय लावतो. हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पाटील यांनी पांडे यांचे अभिनंदन केले.
उदय सामंत म्हणाले, पुस्तकांची जत्रा हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. जे साहित्य निर्माण होते त्याच्या मागे शासन उभे करण्याची जबाबदारी आमची आहे. परंतु, पुस्तक महोत्सव भरविण्यासाठी पुणे शहराच्या बाहेरही पडले पाहिजे. अशा महोत्सवातून बाल पुस्तकांची चळवळ उभी राहील अशी आशा आहे. पुण्याला मराठीचा वारसा, सांस्कृतिक वारसा, शिक्षणाची पंढरी असून येथे जे काही मराठी भाषेत निर्माण होते त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असतात. त्यामुळे अशा बाल पुस्तकाच्या जत्रा जिल्हास्तरीय झाल्या पाहिजेत, यासाठी पुढाकार घेण्यात येईल. त्याचे संयोजन आणि नियोजनाची जबाबदारी पुणे पुस्तक महोत्सवाने घ्यावी, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे हे शहर वाचनसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती असलेले आहे. या जत्रेमध्ये येथे बालकांसाठी खेळ येथे पाहायला मिळाले. खेळांमुळे एकाग्रता वाढते, शारीरिक क्षमता वाढतात. आम्हाला आई वडिलांनी पुस्तकांची खूप आवड लावली. पुण्यात पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.
चंद्रकांत पाटील यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी देऊन पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधला. मुलांचे खेळ पाहतानाच स्वत: त्यांनी विटी-दांडू हाती घेऊन खेळाचा थोडा आनंद घेतला. राज्यमंत्री मिसाळ यांनी लगोरी खेळाचा आनंद लुटला. यावेळी पालक, लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. पुस्तके हातात घेताना होणारा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खेळांचा आनंदही त्यांनी मनमुराद लुटला.
यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल, बुलढाणा अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लेखक ल. म. कडू, लेखिका संगीता बर्वे, साहित्यिक राजीव तांबे, संवाद संस्थेचे संस्थापक संचालक सुनील महाजन, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.