माझे वडिल बापू.. वयाची ९९ वर्षे आणि दहा महिने पूर्ण झाले असताना..कुठलाही आजार नसताना..कलिंगड खाल्ले अन् त्यानंतर उलटी झाली एवढेच निमित्त झाले आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला..आज (२६ मे) त्यांचा पाचवा स्मृतिदिन!औषधांचा आणि इंजेक्शन वगैरेचा त्यांचा फारसा कधी संबंध आलाच नाही! निर्मळ मनाचा,भाबडा पण तापट गिरणी कामगार! टिपिकल गिरणी कामगाराची सगळी स्वभाव वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होतीच.पण ती सर्व स्वभाव वैशिष्ट्ये निर्मळ प्रेम आणि भाबडेपणाच्या कोंदणात अशी काय सजली जायची की बापूची शिवी खाणाऱ्याला ती शिवी कधी वाटलीच नाही. बापूंच्या शिव्यांचा स्टॉकही जबरदस्त आणि अफलातून होता!..अशा आमच्या बापूची जिद्द, कष्टाळू वृत्ती आणि सोशिक पिंड अचंबित करणारा होता.. मी अकरावीला असतानाची घटना..नवी चप्पल खरेदी केल्या नंतर एके दिवशी बापू आमच्या बार्शीचे ग्रामदैवत श्री. भगवंताच्या दर्शनाला गेले होते. मंदिराच्या बाहेर चपला सोडून ते दर्शनाला गेले. दर्शन घेऊन मंदिरातून माघारी आले तर त्यांची चप्पल गायब! खूप शोधा शोध करुनही बापूंना चप्पल काही सापडली नाही.. मग काय बापूंचा त्रागा.. शिव्यांची लाखोली.. चप्पल काही सापडलीच नाही.पण बापूंनी त्या दिवशी असा काही निर्णय घेतला की, बापूंचा तो निर्णय आम्ही बापूंच्या शेवटच्या श्वासापर्यंतही बदलू शकलो नाही.तो निर्णय काय होता? “भगवंताच्या दारात माझी नवी चप्पल हरवली.. आज पासून मी नवी चप्पल घालणार नाही!”. बापूंच्या या निर्णयाला बदलण्याचा प्रयत्न आम्ही तब्बल चाळीस वर्षांहून अधिक काळ केला..पण बापू काही बदलले नाहीत.. नवी चप्पल जुनीच असल्याचा सांगण्याचा प्रयत्न ते हाणून पडायचे. आयुष्यभर त्यांनी माझ्या व भावंडांच्या जुन्याच चपला वापरल्या.. माझ्या अनेक जिद्दी निर्णयात मला अनेकदा माझे बापूच दिसतात!…त्यांची ज्या ज्यावेळी आठवण येते त्या त्या वेळी भरुन येते आणि मन म्हणते…बापू,तुमच्या सारखा निर्मळ भाबडेपणा दुर्मिळ झालाय हो!
-राजा माने.