पुणे : प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे प्रकरणी पुणे कोर्टाने बावधन पोलिसांना तंबी दिली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या आरोपींना फरार झाल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. यावरून कोर्टाने पोलिसांना फटकार लगावली. तुम्ही आरोपींना नोटीस पाठवू शकला असता. त्यांना अटक करण्याची गरज काय होती, असा सवाल करत कोर्टाने बावधन पोलिसांना फटकारले.
आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांना आश्रय देण्याच्या कारणावरून पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. या सर्वांना बाधवन पोलिसांनी कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. हे पाचही जण बाहेर पडण्याआधी पुणे न्यायालयाने पोलिसांना तंबी दिली. सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्याची गरज नसून नोटीस देता येते. सदर गुन्ह्यात जामीन मिळू शकतो, हे माहीत असतानाही अटक का केली, अशी विचारणा न्यायालयाकडून पोलिसांना करण्यात आली.
दरम्यान, हगवणे बंधूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या दोघा भावांकडील पिस्तूल परवाण्याची चौकशी सुरू केली आहे. पिस्तुलाचा परवाना घेत असताना हगवणेने पुण्यातील रहिवाशी म्हणून पत्ते दिल्याचे समोर आले आहे. याची चौकशी झाल्यानंतर त्यात बेकायदेशीर काही आढळले तर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. राजेंद्र हगवणे यांचे कुटूंब मुळचे भूकुममधील आहे. ते राहण्यास बावधन परिसरात आहे. हगवणेचा कायमस्वरुपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मात्र, त्यांनी पुण्यात निवास असल्याचे दाखवून पिस्तुल परवाना घेतला. त्यासोबतच निलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतले आहे. या प्रकरणाची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
हगवणे बंधूंनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यांतर्गत परवान्यासाठी अर्ज केला होता. नंतर पडताळणी करून त्यांना परवाना दिला गेला. यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरार दिल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. एकाच घरातील शशांक आणि सुशील यांना एकाच वेळी सुरक्षेसाठी पिस्तुलाची काय अवश्यकता निर्माण झाली? ते तत्कालीन पौड पोलिसांच्या हद्दीत राहत असूनही पुणे पोलीस आयुक्तालयातून पिस्तुल परवाना कसा घेतला, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.