विक्रमी १५९.४ मि.मी. पावसाची नोंद, मे महिन्यात पावसाचा नवा उच्चांक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये मे महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यंदा मान्सूनने विक्रम केला. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत मान्सून वेळेआधीच दाखल झाला. तसेच मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झाला. मे महिन्यात विक्रमी १५९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस एकूण सरासरी पेक्षा ११ पट जास्त आहे.
मे महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भर उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आला. धरणांमध्ये जलसाठा वाढला आणि धबधबे वाहू लागले. देशभरातील मार्च ते मे या तीन महिन्याची सरासरी पाहिल्यास ४२ टक्के जास्त पाऊस झाला. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मे महिन्यात बदल दिसून आला. या दोन्ही समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. यामुळे महाराष्ट्रासह देशभरात दमदार पाऊस झाला. मे महिन्यात कडक ऊन असते. तापमान वाढलेले असते. राज्यातील अनेक शहरांमध्ये ४० अंशाच्या वर तापमान असते. परंतु यंदा मे महिन्यात कमाल तापमानात मोठी घट झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळताना पावसाळ्याचा अनुभव आला.
१९०१ पासूनच्या नोंदीनुसार राज्यात मे महिन्यातील पावसाची सरासरी १४.४ टक्के आहे. परंतु यंदा सरासरीपेक्षा ११ पट जास्त म्हणजे १५९.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे नवीनच विक्रमाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९१८ मध्ये मे महिन्यात ११३.६ मिलिमीटर पाऊस झाला होता.