डिजिटल इंडियाचा नारा, तंत्रज्ञान क्षेत्रात नवी झेप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या ११ वर्षांत भारताने डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून प्रशासन, सार्वजनिक सेवा आणि अनेक क्षेत्रात ऐतिहासिक बदल पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात डिजिटल इंडिया ही केवळ एक संकल्पना ठरली नाही तर परिवर्तनाचा दूत ठरली. तंत्रज्ञानातील नवीन झेप ग्रामीण भागात बदलाचा पाया रोवणारी ठरली. या नव्या बदलामुळे ग्रामीण भागातही अनेक जणांना काही ना काही हाती लागले.
यूपीआय आणि डिजिटल पेमेंट
डिजिटल व्यवहाराचा चेहरा बदलण्यात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचा मोठा वाटा आहे. दैनंदिन व्यवहाराचे युपीआय हे प्रमुख माध्यम झाले आहे. मार्च २०२५ मध्ये केवळ एका महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून २४.७७ लाख कोटी रुपयांचे १८,३०१ दशलक्ष व्यवहार झाला. आज ४६० दशलक्षहून अधिक आणि ६५ दशलक्ष व्यापारी यूपीआयचा वापर करत आहेत. एसीआय वर्ल्डवाईडच्या एका अहवालानुसार २०२३ मध्ये जागतिक रियल टाईम पेमेंटमध्ये भारताचा वाटा ४९ टक्के इतका मोठा आहे.
आधार आणि डीबीटीमुळे पारदर्शकता
आधारने डिजिटल ओळख अधिक विश्वासार्ह ठरली आहे. ई-केवायसी आणि सेवा वितरण सरळ आणि सुटसुटीत केले आहे. एप्रिल २०२५ पर्यत १४१.८८ कोटी आधार तयार झाले आहेत. त्याच्याशी संबंधित ४३.९५ लाख कोटींची लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून हस्तांतरीत करण्यात आली आहे. यामध्ये ५.८७ कोटी बोगस राशन कार्ड आणि ४.२३ कोटी डुप्लिकेट गॅस कनेक्शन हद्दपार झाली आहेत.
डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती
५ जीची सुरुवात आणि ४.७४ लाख बीटीएस टॉवरच्या माध्यमातून भारत जगातील सर्वात वेगवान ५ जी रोलआउट देणारा देश ठरला आहे. भारतनेट योजनेने २.१४ लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींना हायस्पीड, अतिवेगवान इंटरनेटने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावात डिजिटल सेवा पोहचल्या आहेत.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काय बदल
कोविड पोर्टलनुसार २२० कोटींहून अधिक कोविड लसीकरण करण्यात आले. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यात आला. भारत जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाचा अग्रदूत ठरला. सामान्य सेवा केंद्र ग्रामीण भारतात ५.९७ लाख केंद्रांच्या माध्यमातून बँकिंग, विमा आणि शिक्षणासारख्या सेवा देतात.
भाषा, साक्षरता आणि प्रशिक्षण
भाषिनी प्लॅटफॉर्म ३५+ भाषांमध्ये सेवा देते. यामध्ये भाषिक अडचण दूर करण्यात आली आहे. पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाने ६.३९ कोटी ग्रामस्थांना डिजिटल साक्षर करण्यात आले. कर्मयोगी भारत पोर्टलवरुन १.०७ कोटी सामान्य सेवक, डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले.
तंत्रज्ञानातून आत्मनिर्भरतेकडे
वाटचाल : इंडिया एआय मिशन
इंडिया एआय मिशन, भारत सेमीकंडक्टर मिशन आणि संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणात मोठी झेप घेतली आहे. या योजनांमुळे भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल केली आहे. मे २०२५ पर्यंत भारताची जीपीयू क्षमता ३४,००० पेक्षा अधिक झाली असून १.५५ लाख कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजूरी मिळाली.
संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाचा नारा
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने आतापर्यंतचा सर्वाधिक संरक्षण उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. हे उत्पादन १,२७,४३४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. २०१४-१५ मध्ये हा आकडा ४६,४२९ कोटी रुपये होता, म्हणजेच गेल्या १० वर्षांमध्ये या आकड्यात १७४ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस, अर्जुन टँक, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर यासह विविध स्वदेशी बनावटीची नौदल जहाजे ही भारताच्या वाढत्या तांत्रिक क्षमतेचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहेत.