पुणे : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे शुक्रवारी पुण्यात आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भवानी पेठेतील विसाव्याच्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि अध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेतली. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा देखील झाली.
देवेंद्र फडणवीस यांचा मंदिर समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप,भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, रोहिणीताई पवार,चैतन्य लोंढे,पालखी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आषाढीवारी निमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी विठ्ठल नामाच्या गजारात आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे विठ्ठल मंदिरात आगमन झाले. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर वारकरी व भक्तगण उपस्थित होते.