दीर्घ आजाराने निधन, साई संस्थानच्या वतीने श्रद्धांजली
मुंबई : प्रतिनिधी
हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत भीरत कुमार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. चित्रपट अभिनेते मनोजकुमार यांनी चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांचे आणि शिर्डीच्या साईबाबा संस्थानशी एक वेगळे नाते होते. त्यामुळे मनोजकुमार यांच्या निधनाची वार्ता कळताच साई संस्थानच्या वतीने त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवार, दि. ४ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले. मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये भारत कुमार म्हणून ओळख मिळाली. चित्रपट सृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानामुळे मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मधे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मनोज कुमार यांचा १९६४ मधील मिस्ट्री थ्रिलर असलेला वो कौन थी? सुपरहिट ठरला. या चित्रपटातील लग जा गले आणि नैना बरसे रिमझिम ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायिली होती.
दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील एका पंजाबी हिंदू ब्राम्हण कुटुंबात झाला होता. मनोज कुमार यांंचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे आहे. फाळणीनंतर मनोज कुमार १० वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब जंदियाला शेरखान इशून दिल्लीला स्थलांतरीत झाले.
गाजलेले चित्रपट
मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब औरÞ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांती हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचे तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केले होते. मनोज कुमार यांनी सहारा (१९५८), चांद (१९५९) आणि हनीमून (१९६०) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. आणि त्यानंतर त्यांना कांच की गुडिया (१९६१) मिळाला. ज्यामध्ये ते पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसले. यानंतर पिया मिलन की आस (१९६१), सुहाग सिंदूर (१९६१), रेश्मी रुमाल (१९६१) हे चित्रपट त्यांनी केले. १९६२ मध्ये विजय भट्ट यांच्या हरियाली और रास्ता या चित्रपटाने त्यांना सर्वात मोठे यश मिळाले, जो व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला. या चित्रपटात माला सिन्हा होत्या. हरियाली और रास्ता, शादी (१९६२) च्या यशानंतर डॉ. विद्या (१९६२) आणि गृहस्थी (१९६३) या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.