तब्बल ४४ टक्के कपात, रखडलेले वेतन मंगळवारपर्यंत देणार
मुंबई : प्रतिनिधी
रात्र-दिवस जनतेची सेवा करणा-या एसटी बस कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे केवळ ५६ टक्केच वेतन झाले आहे. आणखी ४४ टक्के वेतन रखडले आहे. त्यामुळे एसटी कर्मचा-यांचे हाल होत आहेत. त्यामुळे कर्मचा-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुळात एसटी कर्मचा-यांचे वेतन दरमहा ७ तारखेच्या आत करण्याची ग्वाही सरकारने दिली आहे. परंतु प्रत्यक्षात कर्मचा-यांचे हाल होत आहेत. दरम्यान, याचे तीव्र पडसाद कर्मचा-यांमध्ये उमटल्याने आता मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी थकित वेतन देण्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. राज्यात एकूण ८७ हजार एसटी कर्मचारी असून, त्यांना वेतनासाठी ४६६ कोटी रुपये लागतात. परंतु सध्या केवळ ३०५ कोटी रुपयेच दिले आहेत.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचा-यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. राज्यातील ८७ हजार कर्मचा-यांना निम्मे वेतन देणे चुकीचे आहे. कर्मचा-यांना ३० ते ५० हजारांच्या आसपास वेतन आहे. यात ४४ टक्के कपात करून त्यांच्या वेतनावर डल्ला मारणे योग्य नाही. एसटीतील ८७ हजार कर्मचा-यांना वेतन व एलआयसीसाठी महिन्याला ४६६ कोटी रुपये लागतात. शासनाने केवळ ३०५ कोटी २९ लाख रुपये दिले. त्यामुळे कर्मचा-यांच्या मार्चच्या वेतनात ४४ टक्के कपात करण्यात आली.
एसटी कर्मचा-यांना एप्रिल महिन्याचे फक्त ५६ टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचा-यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. कर्मचा-यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचा-यांचे या महिन्याचे उर्वरित ४४ टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचा-यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर रखडलेले वेतन वेळेत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
९०० कोटींची मागणी होत असताना केवळ २७२ कोटी मिळावे हे बरोबर नव्हते, ३० ते ५० हजारांचा पगार त्यांना असतो, भविष्य निर्वाह निधी वगैरे पण द्यायचा असतो, ही सर्व बाब समोर आली, काल मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. त्यांनी मग वित्त सचिवाची बोलून मंगळवार पर्यंत पगार होईल असे सांगितले आहे. आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा पगार मागत आहोत, या महिन्यात प्रश्न सुटला पाहिजे, इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो, एस टी कर्मचाऱ्यांचे का नाही मिळत? असा सवाल सरनाईकांनी उपस्थित केला आहे.
कर्मचा-यांचा महागाई भत्ता
२०१८ पासून प्रलंबित
एस. टी. कर्मचा-यांचा महागाई भत्ता २०१८ पासून प्रलंबित आहे. भत्ता एकरकमी द्या, असे हायकोर्टाचे आदेश असूनही भत्ता दिलेला नाही. सध्या कर्मचा-यांचा ५६ टक्के महागाई भत्ता थकित आहे. त्यातच मार्च महिन्याचा पगार ५६ टक्केच दिला. इतिहासात पहल्यांदाच असा प्रकार घडला. कर्मचा-यांचे पगार दर ७ तारखेला होत नाहीत. एसटीचे रोज सरासरी २२ कोटी उत्पन्न म्हणजे महिन्याला ६६० ते ७०० कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. कर्मचा-यांच्या वेतनासाठी दरमहा ४४० कोटी रुपये लागतात. तालुकास्तरावर घरभाडे ८ टक्के असताना ७ टक्केच मिळते, अशा कर्मचा-यांच्या तक्रारी आहेत.