मुंबई: महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वांना आलीच पाहिजे. मात्र, देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी पर्याय म्हणून लोकांनी हिंदी भाषा शिकण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले.
ते म्हणाले की, यासंदर्भात नवे शैक्षणिक धोरण यापूर्वीच लागू केले आहे. हा नवा निर्णय नाही. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. हा आमचा आग्रह आहे. पण या देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषा हा एक पर्याय आहे. त्यामुळे लोकांनी ही भाषाही शिकावी असा आमचा प्रयत्न आहे.
कुणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्यांना इंग्रजी शिकता येईल. अन्य एखादी भाषा शिकायची असेल तर कोणतीही मनाई
नाही. पण मराठी सर्वांना आली पाहिजे. तसेच आपल्या देशातील इतर भाषाही आल्या पाहिजेत. केंद्राने याविषयी विचार केला आहे. आपल्या देशात संपर्काची एक भाषा असावी असा केंद्राचा विचार आहे. त्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
मनसेचा हिंदीच्या सक्तीला विरोध
दुसरीकडे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे. हिंदी ही भारताची राजभाषा नाही. दुसऱ्या राज्याची भाषा तुम्ही आमच्यावर थोपू शकत नाही. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती झाल्यास मनसे निश्चितच आंदोलनाची भूमिका घेईल, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.