राज ठाकरे यांनी घातली साद, उद्धव ठाकरेही तयार
मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवार, दि. १९ एप्रिल २०२५ रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी साद घातली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही आॅफर स्वीकारण्यास होकार दिला. मात्र, त्यांनी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली आहे. ती म्हणजे एकदा पाठिंबा द्यायचा आणि पुन्हा विरोध करायचा, मग परत तडजोड करायची हे नाही चालणार. असा ठाम निश्चय असेल तर अजूनही महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याची धमक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे कामगार सेनेतील एका कार्यक्रमात बोलत होते. या अगोदर राज ठाकरे यांनी आमच्यात किरकोळ भांडणे आहेत, ती बाजूला ठेवली तर आम्ही कधीही एकत्र येऊ शकतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांना साद घातली. त्याला उद्धव ठाकरे यांनी लगेच प्रतिसाद दिला. किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे, मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचे सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची, हे असे चालणार नाही. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचे आगत स्वागत करणार नाही, हे पहिले ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणे मी आज सांगतो, जी भांडणे माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिले हे ठरवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी माणसाचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे…प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे…खूप जणांना काही देता नाही आले तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले…आज सुद्धा कायदे आणलेत कामगारांचे त्याला विरोध केलाच पाहिजे…पण निवडणुकीच्या वेळेला आपण विस्कळीत असतो. आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत…शेतकºयांचे कार्य कायदे आले तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला, तसा कामगार रस्त्यावर उतरला नाही…त्यांचे मिशन हेच आहे की कोणी एकत्र आला नाही पाहिजे…आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून यांचे काय चाळे चालले आहेत ते पाहा…मुंबईतसुद्धा काही गोष्टी अदानीच्या कशात घालायच्या…आणि तुम्ही त्यावर बोलू नये म्हणून तुम्हाला भांडणात व्यस्त ठेवायचे…आता काय दुर्दैवाने सरकार आले आहे ते आता जाहीरनाम्यावर काहीच कोणीच बोलत नाही…तुम्ही मारलेल्या थापा ऐकून मतदान केले असे आपण एक वेळ म्हणू…पण त्यावर आता कोणीच बोलत नाही…
हिंदीवरून राजकारण पेटणार
महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती करण्याचा निर्णय हा माझ्या मंत्रिमंडळाने घेतला…जो महाराष्ट्रात राहिला त्याला मराठी ही आलीच पाहिजे…तुम्ही करता हिंदीची सक्ती, आम्ही होऊ देणार नाही हा भाग वेगळा…इथे राहता आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.