मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम
मुंबई : इंग्रजीला पालख्या अन् हिंदीला विरोध का? असा सवाल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम भूमिका व्यक्त केली.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असून ती सर्वांनी शिकलीच पाहिजे. मात्र, त्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती शिकता येईल. इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार? असा सवाल त्यांनी केला.
यवतमाळमध्ये पाणी टंचाईने एका १२ वर्षीय मुलीचा बळी गेल्याबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, पाणी टंचाईच्या भागात जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार दिले आहेत. एप्रिल व मे महिन्यांत राज्यातील विविध भागांत पाणीटंचाई निर्माण होते. त्याठिकाणचा आराखडा तयार करून त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे अशाप्रकारची घटना कुठे घडली असेल तर तिथल्या अडचणी समजून घेऊन मार्ग काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.