मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला पनवेल सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तब्बल ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला.
या हत्या प्रकरणातील इतर आरोपी कुंदन भंडारी व महेश पार्डीकर या दोघांना न्यायालयाने प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावली. आतापर्यंत तुरुंगात राहून शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यामुळे या दोघांची सुटका होण्याची शक्यता आहे.
कसे घडले, अश्विनी बिद्रे हत्याकांड
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे ११ एप्रिल २०१६ रोजी कळंबोली येथून अचानक बेपत्ता झाल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरची पोलीस ठाण्यात भेट घेतली होती. या भेटीनंतर कुरुंदकरने त स्वतःच्या कारमध्ये अश्विनी यांची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर लाकूड कापण्याच्या कटरने शरीराचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिले होते.
अश्विनी बिद्रे यांची हत्या होण्याआधी त्या आरोपी अभय कुरुंदकरला ठाणे येथे सायंकाळी भेटल्या होत्या. ठाणे रेल्वे स्थानकासमोर त्यांनी एका हॉटेलमध्ये सोबत चहा घेतला होता. त्यानंतर एकाच कारने दोघे मीरा रोडला कुरुंदकरच्या घरी गेले होते. बिद्रे आणि कुरुंदकर या दोघांचे मोबाईल लोकेशन आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीतून हे स्पष्ट झाले होते. हत्येच्या दुसऱ्या दिवशी कुंदन भंडारीने अश्विनीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकर याला मदत केली होती.
अश्विनी बिद्रे या मूळच्या हातकणंगले येथील आळते गावच्या होत्या. २००५ साली त्यांचा विवाह राजू गोरे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर २००६ मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उप-निरीक्षकपदी रुजू झाल्या. सांगली येथे पहिल्या पोस्टींगदरम्यान त्यांची ओळख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरसोबत झाली. या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. २०१३ मध्ये अश्विनी बिद्रे प्रमोशनवर रत्नागिरीला आल्या. मात्र, तरीही अभय कुरुंदकरसोबत त्यांचे संबंध कायम होते. अश्विनीने अभय कुरुंदकरकडे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यातून त्यांचा खून झाल्याचे उघड झाले. कुरुंदकरचा बालमित्र महेश फळशीकरने अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती.