मुंबई : प्रतिनिधी
मत्स्यव्यवसायाला आता शेतीचा दर्जा दिला जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय मंगळवार, दि. २२ एप्रिल २०२५ रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मत्स्यव्यवसाय करणाºयांसाठी हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे. शेतीप्रमाणे मत्स्य व्यावसायीकांनाही आता नुकसानभरपाई मिळणार आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या विभागाचा मोठा निर्णय मानला जात आहे.
दरम्यान, मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिल्यामुळे शेतीप्रमाणे मस्त्य व्यवसायालाही विमा, नुकसानभरपाई आणि इतर योजनांचा लाभ मिळणार आहे. यामुळे कोकण किनारपट्टीतील मत्स्य व्यवसायीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील मत्स्यव्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा मिळण्याचे संकेत देण्यात आले होते. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर अंतिम मान्यतेसाठी ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर आज अखेर मत्सव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारतर्फे शेतकºयांना दिल्या जाणाºया विविध योजना आणि इतर लाभ यापुढे मच्छिमारांनाही मिळणार आहेत.