पाकिस्तानवर ड्रोन हल्ला,१२ शहरांत ५० ड्रोनचा मारा
पाकची एअर डिफेन्स,
रडार यंत्रणा बेचिराख
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अकारण गोळीबार सुरू केला. अनेक ठिकाणी मॉर्टर आणि तोफगोळ््याचा मारा करण्यात आला. यामुळे निष्कारण १६ नागरिकांचा बळी गेला. भारतीय लष्करानेही याला जोरदार प्रत्युत्तर देत थेट गुरुवारी सकाळपासूनच पाकिस्तानवर ड्रोन हल्ल्याला सुरुवात केली. भारताने थेट पाकिस्तानच्या १२ शहरांवर ५० ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम, रडार यंत्रणा बेचिराख झाली. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांची रडार यंत्रणा नष्ट केली असून, ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आणि पीओकेमध्ये दहशतवादी तळांना लक्ष केल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरू असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले होते. पाकिस्तानकडून आगळिक होण्याची कल्पना असल्याने भारताकडून तशी तयारी ठेवण्यात आलेली होती. त्यामुळे आज पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर भारताने हल्ला केला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांनी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली.
भारतावरील सैन्याच्या ठिकाणी हल्ला केल्यास उत्तर देऊ, असे आम्ही सांगितले होते. ७ आणि ८ तारखेला पाकिस्तानने भारताच्या अनेक सैन्य ठिकाणांवर हल्ला केला. त्यांनी एकूण १५ ठिकाणावर हल्ला केला. त्यांनी ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला वायू रक्षा प्रणालीने निष्क्रीय केले. या हल्ल्याचा ढिगारा अनेक ठिकाणाहून गोळा केला. तो पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा पुरावा आहे. आज सकाळी भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानच्या अनेक स्थानांना समान क्षेत्रात आणि समान तीव्रतेने लक्ष्य बनवले आणि लाहोर येथील वायू संरक्षण प्रणालीनिष्क्रीय करण्यात आली, असे कुरेशी यांनी सांगितले.