पाकिस्तानला चौफेर घेरले, बलोच आर्मीने फडकवला झेंडा
इस्लामाबाद : वृत्तसंस्था
एकीकडे भारत पाकिस्तानात घुसून कारवाई करत असताना पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरले. बलोच आर्मीने जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलं. तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. कालच सकाळी बलोच आर्मीने आयईडी ब्लास्ट करून पाकिस्तानच्या १४ सैनिकांना यमसदनी पाठवल्याचे समोर आले होते. याआधी याचवर्षी मार्च महिन्यात याच बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करून पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले होते.
क्वेटावरील नियंत्रण गमावले
बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टावरीलही नियंत्रण पाकिस्तानने गमावल्याची माहिती आहे. बलोच लिबरेशन आर्मीने क्वेट्टामधील पाकिस्तानी लष्कराच्या छावण्यांवर मोठे हल्ले केले आहे. पाकिस्तान सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करत बीएलएने क्वेटा ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय बलोचांनी पाकिस्ताने अनेक कॅम्पदेखील नेस्तनाबूत केले. पाकिस्तान आता सर्व बाजूंनी वेढला गेल्याचे चित्र आहे.
१९४८ पासून स्वातंत्र्यवादी चळवळ
बलुचिस्तानचे भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये महत्त्वाचा स्थान आहे. तथापि, येथे कायम अस्थिरता आणि विकासाचा अभाव आहे. बलुचिस्तानमध्ये १९४८ पासून स्वातंत्र्यवादी चळवळी सुरू आहेत. बलुच लिबरेशन आर्मीसारख्या संघटना पाकिस्तान सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष करतात. पाकिस्तान सरकार प्रांताच्या नैसर्गिक संसाधनांचे शोषण करते आणि स्थानिक लोकांना त्यांच्या विकासात सहभागी करत नाही, असा त्यांचा आरोप आहे. या संघर्षामुळे प्रांतात अनेक वेळा हिंसाचाराच्या घटना घडल्या, ज्यात सुरक्षा दलांवर हल्ले, अपहरण आणि बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले.
पाकिस्तानच्या दक्षिण,
पश्चिम भागातील प्रांत
बलुचिस्तान पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागातील सर्वात मोठे, पण तुलनेने कमी लोकसंख्या असलेला प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ सुमारे ३४७,१९० चौ.किमी असून, ते पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या सुमारे ४४% आहे. बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीसारख्या गटांनी पाकिस्तानशी स्वतंत्रतेसाठी सशस्त्र संघर्ष सुरू केला. या संघर्षात अनेकदा सुरक्षा दलांवर आणि परदेशी नागरिकांवर हल्ले होतात. बलुचिस्तानच्या भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय महत्त्वामुळे तो पाकिस्तानसाठी अत्यंत संवेदनशील प्रांत मानला जातो. येथील अस्थिरता आणि स्वतंत्रतेच्या मागण्या भविष्यातही पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतात.
नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न भाग
बलुचिस्तान हे नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असून, येथे कोळसा, तांबे, सोने आणि नैसर्गिक वायू यांचे मोठे साठे आहेत. तरीही हा प्रांत आर्थिकदृष्ट्या मागासलेला मानला जातो आणि स्थानिक लोकसंख्येमध्ये विकासाच्या अभावामुळे असंतोष आहे. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या राज्यात अंतर्गत वाद, धुसफूस अडचणीची ठरत आहे. त्यामुळे हा भाग विकासापासून खूप दूर आहे.