शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
मुंबई : राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडला आणि पक्ष चिन्हासह ते महायुतीसोबत गेले. त्यानंतर शरद पवार यांनी नव्याने बांधणी करून पक्ष उभा केला. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर वेगळे चित्र निर्माण झाले. सद्यस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन मतप्रवाह आहेत. यामध्ये एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जावे, कारण ते सत्तेत आहेत. त्याचा फायदा भविष्यात पक्षाला होईल, असे वाटते तर दुसºया गटाचा याला पूर्णत: विरोध आहे. या पार्श्वभूमीवर पक्षीय बांधणी होत असताना आता शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी आता नव्या पिढीने पुढाकार घ्यावा, असे म्हणत चर्चेला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे.
शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भविष्यात एकत्र यायचे की नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे. जरी आमची माणसे वेगवेगळ््या पक्षांत विभागली गेली असली, तरी विचारधारा मात्र एकच आहे. दिल्लीतील आमचे खासदार एकाच विचाराने जोडलेले आहेत. राज्यातील काही आमदारांना वाटतं की मतदारसंघातील विकासकामं मार्गी लावण्यासाठी अजित पवारांसोबत जाणे गरजेचे आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय मी देणार नाही. हा निर्णय त्यांनाच एकत्र बसून घ्यावा लागेल. एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी चर्चेने निर्णय घ्यावा. पक्ष उभारणीच्या काळात जे लोक माझ्यासोबत होते, तेच आज वेगवेगळ्या बाजूंना गेले आहेत, पण त्यांची विचारधारा अजूनही एकसारखी आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व एकत्र आले, तर मला त्यात काहीच आश्चर्य वाटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणाची किती इच्छाशक्ती,
लवकरच समजेल : भुजबळ
आता शरद पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ म्हणाले की, यापूर्वी आम्ही शरद पवार यांच्याशी बोललो होतो, तेव्हा पवार साहेब हेच म्हणाले तुम्हाला काय करायचे ते करा. मी काय आता त्या प्रक्रियेत नाही, असे ते म्हणाले होते. आताही ते हेच म्हणताय. अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी ठरवावे मी त्यात नाही. आता कोणाची ईच्छाशक्ती किती आहे? हे लवकरच समजेल, असे त्यांनी म्हटले आहे.