चार प्रमुख हवाई तळ उद्ध्वस्त, पाकचे कंबरडे मोडले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने आॅपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला हल्ला केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानाने पुन्हा आगळीक करत गेल्या २-३ दिवसांपासून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ले तसेच मिसाईल हल्ला आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. भारताने या कृतीला चोख प्रत्युत्तर देत पाकचे सर्व हल्ले परतवून लावले. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणि युद्ध अद्यापही सुरूच आहे. दहशतवादाला आश्रय देणाºया पाकिस्तानला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळत आहे.
भारताने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, भारताने शुक्रवार रात्री उशिरा केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक लष्करी आस्थापनांचे आणि मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. रात्री भारताने पाकिस्तानच्या चार हवाई तळावर हल्ला चढवला.
तत्पूर्वी पाकने भारताच्या हवाई तळाला लक्ष्य करीत ड्रोनचा मारा केला होता. श्रीनगर, उधमपूरसह जैसलमेर, अमृतसर हवाई तळांना लक्ष्य करीत ड्रोन सोडण्यात आले होते. मात्र, भारताच्या एस-४०० या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. पाकिस्तानने गुरुवारनंतर शुक्रवारी रात्रीही सीमेलगत ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा सातत्याने सुरू ठेवला होता. परंतु भारतीय हवाई दलाने त्यांचे ड्रोेन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. त्यामुळे भारतीय हद्दीत मोठे नुकसान होऊ शकले नाही. पाकिस्तानचा कुटील डाव लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाने जिथून भारतीय हवाई तळांना लक्ष्य केले जात होते, त्याच हवाई तळांना लक्ष्य करीत पहाटेच्या सुमारास पाकिस्तानचे चार हवाई तळ उद्ध्वस्त केले.
सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार रावळपिंडीतील नूर खान, चकवालमधील मुरीद आणि शोरकोटमधील रफीकी यांच्या हवाई तळांवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यामुळे तेथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आपले हवाई क्षेत्र बंद केले; पेशावरला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) चे विमान पीआयए २१८, जे त्यांच्या हवाई हद्दीतील शेवटचे उड्डाण होते, त्याला क्वेट्टावरून उड्डाण करण्यास भाग पडले.
याचदरम्यान पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद आणि लाहोरसह अनेक शहरांत स्फोटांचे जोरदार आवाज ऐकू आले. मात्र भारताने डागलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र भारतीय हद्दीतच पडले, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला. पण भारताकडून या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, सीमेपलीकडून पाकिस्तानने केलेल्या अनेक ड्रोन हल्ल्यांनंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नीलम व्हॅली आणि सियालकोटमध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
एअर डिफेन्स सिस्टीम मजबूत
भारताने सिरसा येथे भारतीय हवाई क्षेत्रात पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला यशस्वीरित्या रोखल्याचे सोशल मीडियावरील अनेक व्हिडीओद्वारे दिसून आले. सीमेवरील गोळीबाराच्या घटनेनंतर जिल्हा माहिती आणि जनसंपर्क अधिकाºयांनी रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला भारताकडून हाणून पाडला जात आहे. सीमावर्ती भागात एस-४००, आकाशतीर, एल-७०, जु-२३ आणि शिल्का यासारख्या उत्कृष्ट हवाई संरक्षण प्रणाली आकाशात वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे पाकिस्तानचे नापाक डाव उधळून लावण्यात ही सिस्टीम भारताला मदत करत आहे.