मुंबई : प्रतिनिधी
छोट्या पडद्यावरील विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा आणि प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा झालेल्या अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या अनेक दिवसांपासून तुषारला कोणतेच काम मिळत नव्हते. त्यामुळे तुषारला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्याच्या भरात तुषार घाडीगावकर याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
तुषार घाडीगावकर हा मुंबईतील भांडूपमध्ये वास्तव्याला होता. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. तुषार घाडीगावकरने आजपर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये लहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या होत्या. छोट्या पडद्यावरील ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमध्ये काम केले होते तर ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’, या मराठी चित्रपटांमध्येही तुषारने भूमिका साकारली होती. तसेच ‘संगीत बिबट आख्यान’ या नाटकातही तुषार घाडीगावकरने काम केले होते. अलीकडेच ‘सन मराठी’ वृत्तवाहिनीवर सुरु झालेल्या ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतही तो झळकला होता.
तुषार घाडीगावकर हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा होता. त्याने रुपारेल महाविद्यालयात असताना अभिनयाची सुरुवात केली होती. रुपारेलच्या नाट्य विभागात तो परिचित चेहरा होता. मित्रांमध्ये ‘घाड्या’ म्हणून तो ओळखला जात होता. इतक्या तरुण अभिनेत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मराठी कलाविश्वात खळबळ उडाली आहे.
तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वात खळबळ उडाली आहे. अभिनेता अंकुर वाढवे याने फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. या पोस्टवर अभिनेता वैभव मांगलेने प्रतिक्रिया व्यक्त केली. माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात. अपेक्षा आणि वास्तव यांचे गणित कधीच जुळत नाही. दोहोंमधली दरी वाढते आहे. लोक बोलत नाहीत, ऐकायला कान नाहीत. उत्तरे काढायला कुणाला वेळ नाही.. आत्मीयता नाही. अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का? सगळ्यात असून, असे वैभव मांगले यांनी म्हटले आहे.