फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल ९०३ विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर करण्यात आला.
यामध्ये लघुपाटबंधारे योजना, कोअर पाझर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे. या योजनांची अंमलबजावणी गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. भूसंपादनासंदर्भातील अडचणी, स्थानिक नागरिकांचा विरोध आणि काही ठेकेदारांकडून मिळणारे असहकार्य यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शासनाने या योजनांना अधिक वेळ देण्याऐवजी थेट त्यांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे निधीचा गैरवापर टाळण्यास मदत होईल, तसेच नव्या योजनांसाठी मार्ग मोकळा होणार आहे.
राज्यातील विकासासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी अर्धवट राहिलेल्या योजनांमुळे निधी अडकतो आणि प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचत नाही. त्यामुळे अशा योजनांना हटवून कार्यक्षम योजना राबवण्याचा सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या निर्णयामुळे जिल्हा आणि तालुका स्तरावर काय परिणाम होतील, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यातील बहुचर्चीत लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याची चर्चा आहे. दर महिन्याला हजारो कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी राखीव आहे. त्यासाठी इतर विभागांचा निधी वळवल्यामुळे त्या-त्या विभागांनी नाराजी वर्तवल्याची उदाहरणे गेल्या काही दिवसात समोर आली होती. त्यामुळे आता रखडलेल्या योजना रद्द करण्याामागे हे सुद्धा कारण आहे का, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.