अमरावती : प्रतिनिधी
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनात वाढ या प्रमुख दोन मागण्या घेऊन गेल्या ७ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर आपले उपोषण आज मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जमाफीबद्दल कधीच बोलत नव्हते. पण आपल्या आंदोलनानेत्यांना यावर बोलायला भाग पाडले. अजित पवार आज पुण्यातील कार्यक्रमात बोलले, असे म्हणत बच्चू कडू यांनी सरकारने आपल्या मागण्या विचार घेतल्याचे सांगत अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.
या अगोदर सरकारच्या वतीने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी बच्चू कडू यांनी भेटली होती. या भेटीत सरकारने त्यांच्या मागण्यांची गंभीरतेने दखल घेतली असून मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय पटलावर येईल, असे म्हटले होते. त्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडूंनी आपले उपोषण सोडले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल आश्वासन दिले, तेच पत्र उदय सामंत यांनी बच्चू कडूंना दिले आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरु होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट घेत अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. मात्र बच्चू कडू आपल्या मागण्यांवर आणि उपोषणावर ठाम होते. बावनकुळेंनी कडूंची मुख्यमंत्र्यांशीही चर्चा घडवून आणली. यावेळी कडूंच्या पत्नी नयना कडू भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून बच्चू कडू यांच्याकडून सरकारला २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास २ ऑक्टोबरनंतर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मागण्या मान्य न केल्यास
पुन्हा आंदोलन करणार
आपले अन्नत्याग आंदोलन आपण मागे घेत नसून पुढे ढकलत असल्याचे कडू यांनी म्हटले. दरम्यान, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडूंनी दिला. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांच्याकडून पाणी पिऊन कडू यांनी आपले आंदोलन मागे घेतले.