उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : नांदणी मठ (कोल्हापूर) येथील महादेवी (माधुरी) हत्तीणीला परत आणण्याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीणीच्या संदर्भात कोल्हापूरमधील जनतेच्या भावनांशी राज्य सरकार एकरूप आहे. महादेवीला परत नांदणी येथे आणण्यात नक्की यश येईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने जी पुनर्वीचार याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांना आश्वस्त करण्यात आले. या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माधुरी हत्तीण परत यावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
एकूणच आज झालेल्या बैठकीवरून महादेवीला परत नांदणी येथे आणण्यात नक्की यश येईल, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.