नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस उघडणार
जागतिक दर्जाचे शिक्षण नवी मुंबईत मिळणार, विदेशी विद्यापीठांशी करार
मुंबई : प्रतिनिधी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आता भारताने जगातील सर्वोत्तम विद्यापीठांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. शनिवार, दि. १४ जून २०२५ रोजी ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये आपले कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट देण्यात आले. लवकरच आणखी ५ परदेशी विद्यापीठे येथे आपले कॅम्पस सुरू करतील, अशा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र यांनी येथे व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबई येथे एमपीएसटीएमई आणि एनएमआयएमएस इमारतींचे उद्घाटन, तसेच एसव्हीकेएम शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. आता भारताने जगाच्या सर्वोत्तम विद्यापीठांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ते शक्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना नवी मुंबईतील एज्युसिटीमध्ये आपले कॅम्पस स्थापन करण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ देण्यात आले. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण येथेच मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एआयमुळे दर ३ महिन्यांनी
तंत्रज्ञानाची नवी पिढी
पूर्वी तंत्रज्ञानाची एक पिढी बदलायला ७ वर्षांचा कालावधी लागायचा, मग तो कालावधी तंत्रज्ञानामुळेच ३ वर्षांवर आला. आता एआयमुळे प्रत्येक ३ महिन्यांनी तंत्रज्ञानाची नवी पिढी तयार होते, म्हणून ‘लर्न, अनलर्न आणि रिलर्न’ हा आजचा मंत्र आहे. हा मंत्र आपलासा करण्याची क्षमता असलेलेच पुढे जातील. त्यामुळे नव्या शक्यता खुल्या होत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
स्टार्टअप्ससाठी ‘फंड ऑफ फंड्स’
आगामी काळात स्टार्टअप इकोसिस्टम अधिक बळकट करणे गरजेचे आहे. आज महाराष्ट्र आणि मुंबई भारताची स्टार्टअप कॅपिटल आहे. ‘स्टार्टअप इंडिया’च्या अहवालानुसार महाराष्ट्र गुंतवणूक आणि ‘स्टार्टअप’ संख्येतही देशात क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्र शासनाने स्टार्टअप्ससाठी ‘फंड ऑफ फंड्स’ तयार केला आहे आणि त्याद्वारे शेकडो स्टार्टअप्स उभे राहिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.