२ टप्प्यांत नियोजन, मूळ जनगणनेत आता जातीचा कॉलम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जनगणना आणि जातीय जनगणनेला १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जनगणना आणि जातीय जनगणना ही २ टप्प्यांत होणार आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणना सुरू होणार आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ ला तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होणार आहे. यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातीचा कॉलम असेल, असेही सूत्रांनी सांगितले.
देशात जातनिहाय जनगणनेच्या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दर्शवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत आगामी जनगणनांमध्ये जातींच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जनगणना कधी होणार, हे निश्चित नव्हते. आता जनगणना करण्याची तारीख समोर आली असून दोन टप्प्यांत ही जनगणना होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ रोजी, तर दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होणार आहे. यासंबंधीची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
जनगणना करणारे कर्मचारी प्रत्येक घरांत जाऊन लोकांची माहिती गोळा करतील, यामध्ये त्यांच्या जातीबाबतची माहिती देखील घेतली जाणार आहे. जातनिहाय लोकसंख्या जाणून घेणे, समाजातील विविध वर्गांची स्थिती जाणून घेणे हे त्यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगणयात आले.
कोरोनामुळे जनगणना
केली होती स्थगित
भारतात २०११ मध्ये शेवटची जनगणना झाली होती. तत्पूर्वी दर १० वर्षांनी देशात जनगणना केली. त्यानुसार २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनामुळे केंद्र सरकारने जनगणनेचा निर्णय स्थगित केल्याचे सांगितले गेले. परंतु कोरोना झाल्यानंतरही जनगणना होऊ शकली नाही. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. तसेच जातनिहाय जनगणनेची मागणीही विरोधकांनी लावून धरली. त्यावर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. आता २०२६ पासून जनगणना सुरू होणार आहे. त्यात जातनिहाय कॉलमही असणार आहे.