ठाकरे गट-मनसे युतीचे काय, उलटसुलट चर्चा रंगली
मुंबई : प्रतिनिधी
दोन्ही ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची चर्चा सुरु असताना गुरुवार, दि. १२ जून २०२५ रोजी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे वांद्रयाच्या ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये पोहोचले. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा त्यांच्या ताफ्यासह दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये येथे राजकीय खलबतेही झाली. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीच्या शक्यतेवर काय परिणाम होणार? हे लवकरच समजेल. मात्र, या निमित्ताने राज ठाकरे यांच्या मनात नेमके काय, हाही प्रश्न पुढे येत आहे. एकीकडे ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते यांची मने जुळत आहेत. असे असताना राज ठाकरे फडणवीस यांना भेटल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
उद्धव ठाकरे गट महायुतीच्या विरोधात आहे. राज ठाकरे यांचे महायुतीच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे उत्तम नाते आहे. दोन्ही नेते अनेकदा शिवतीर्थवर येत असतात. त्यामुळे आजची भेट झाली तर उद्धव ठाकरे गट त्यावर कशी भूमिका घेतो. यावर पुढची गणिते अवलंबून आहेत.
एकीकडे राज्यात राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यानंतर महिनाभरापासून या चर्चेला दोन्ही नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच राज ठाकरे आणि फडणवीस एकाच हॉटेलमध्ये उपस्थित असणे आणि त्यांच्यात चर्चा होणे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला आपला विस्तार आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करता येते. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे सगळ्या देशाच लक्ष लागलेले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? ही चर्चा रंगली आहे. दोन्ही बाजूंकडून युती होण्याचे संकेत मिळत आहेत. यावरून खालच्या पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरु झाले आहे. सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्षांनी एकत्र येणे ही गरज बनली आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे, हे एकमेव कारण नाही, यंदाची निवडणूक एकप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. उद्धव ठाकरे गटातून मागच्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झाले आहे. त्यामुळे जनाधार टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने मनसे आणि उद्धव ठाकरे गट या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येणार का, हा प्रश्न आहे.