पुणे : प्रतिनिधी
एकीकडे कॉंग्रेस भाजपविरोधात आक्रमक होत आहे. मात्र, त्याचवेळी कॉंग्रेसचे बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. आता माजी आमदार संग्राम थोपटे यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे थोपटे भाजपमध्ये जाणे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला आव्हान असणार आहे. कारण राष्ट्रवादीनेच थोपटे यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे भविष्यात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होऊ शकते.
काँग्रेसला गेल्या काही वर्षांत अनेक राजकीय घराणे सोडून गेले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अशा असंख्य नेत्यांनी काँग्रेसमध्ये मोठी पदे भोगून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता यामध्ये आणखी एका नेत्याची भर पडताना दिसत आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
संग्राम थोपटे हे तीन वेळेस आमदार राहिले आहेत. त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीकडून ती पूर्ण झाली नाही. संग्राम थोपटे हे अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत. अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसकडून १४ वर्ष मंत्रिपद भूषवले होते. अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे ६ वेळेस आमदार झाले होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात १४ वर्षे मंत्री म्हणून काम केले होते. ज्यामध्ये त्यांनी विविध खात्यांचे कार्यभार सांभाळले . त्यांचे पुत्र, संग्राम थोपटे हे देखील भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी वडिलांचा राजकीय वारसा प्रभावीपणे पुढे चालवला आहे.
थोपटे घराण्याने भोर तालुक्यात ४० वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता उपभोगली आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत थोपटे घराण्याला सर्वात मोठा हादरा बसला. संग्राम थोपटे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला. पराभव होताच संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार केला होता. शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी संग्राम थोपटे यांचे वडिल अनंतराव थोपटे यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र, आता सुप्रिया सुळे यांच्यासाठीदेखील हा मोठा धक्का मानला जात आहे.