सुसाईड नोटमध्ये कर्जबाजारी झाल्याचा उल्लेख, सर्वत्र हळहळ, चित्रपट सृष्टीवर शोककळा
मुंबई : झगमगाटाच्या दुनियेत वावरताना नेहमी जमिनीवर पाय ठेवून आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याइतपत उत्पन्नाचे स्रोत कायम ठेवून सर्वांसोबत राहिले तर कधीही पायाखालची वाळू घसरत नाही. परंतु बेभरोशाच्या क्षेत्रात कुठलाही विचार न करता वावरत राहिलो तर कुठे ना कुठे आच लागते. याच कारणामुळे कोणतीही व्यक्ती गोत्यात येते. तसाच प्रकार प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आशिष उबाळे यांच्या जीवनात घडला आणि करिअर बहरात येत असतानाच आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले. नागपूरमधील रामकृष्ण मठात त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे सिने विश्वावर शोककळा पसरली आहे. १७ मे २०२५ रोजी दुपारी ही घटना घडली.
आशिष उबाळे हे मूळचे पुण्याचे रहिवासी होते. ते उत्तम मराठी साहित्यकार आणि लेखक दिग्दर्शक होते. मात्र काही दिवसांपासून त्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले. नागपूर येथील रामकृष्ण मठामध्ये आशिष उबाळे यांचा लहान भाऊ सारंग उबाळे हा सेवेकरी म्हणून काम करतो. त्याला भेटण्यासाठीच ते नागपूरात गेले होते. त्यासाठी ते काही दिवस रामकृष्ण मठातील गेस्ट हाउसमध्ये राहत होते. आत्महत्येच्या दिवशी सकाळी त्यांनी दर्शन घेऊन मठात जेवण केले आणि नंतर विश्रांतीसाठी म्हणून ते रूमवर गेले. दुपारी आणि संध्याकाळी ते बाहेर आलेच नाही. त्यामुळे त्यांना उठवण्यासाठी त्यांचा भाऊ रूमवर गेला. पण बरेचदा आवाज देऊनही आत मधून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा आशिष उबाळे यांनी गळफास घेतल्याचे समोर आले.
आशिष उबाळे यांनी स्वत:लाच एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला होता. ज्यामध्ये त्यांनी कर्जबाजारी झाले असल्यामुळे जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या आत्महत्येमुळे अनेकांना धक्का बसला. त्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यात मराठी मालिकांच्या लोकप्रिय लेखिका रोहिणी निनावे यांनी फिल्मी दुनियेतील वास्तव सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मांडले आणि या झगमगाटात भविष्याचा विचार करून कशी सावध पावले उचलली पाहिजेत, याचा धडाही दिला. त्यांच्या या एका पोस्टने संकट काळातही जगण्याचे बळ मिळणार आहे आणि जगण्याचा सुकर मार्गही सापडणार आहे.
लेखक, दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाचून अतिशय वाईट वाटले. तो अतिशय शांत स्वभावाचा होता. कर्ज झाल्यामुळे निराशा येऊन त्यांनी आत्महत्या केली, असे वाचले. मुळात हे क्षेत्र अतिशय बेभरवशाचे आहे. आज काम आहे तर उद्या नाही. तुमच्याकडे कितीही अनुभव असो आणि तुम्ही तुमच्या कामात किती हुशार असा.. पण कधी कधी काम मिळतच नाही.. म्हणूनच आपल्याला पैसे जपून वापरायला हवेत.. गुंतवायला हवेत किंवा पैसे कमावण्यासाठी पर्यायी मार्ग शोधायला हवा.. सध्या फारच वाईट परिस्थिती आहे. काम खूप ठिकाणी होत आहे पण त्यासाठी बरीच तडजोड करावी लागते. कारण हे क्षेत्र जी मागणी करते ती सगळेच पूर्ण करू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. हे खरोखरच सत्य आहे. आपल्याच कामाच्या पैशांसाठी शंभर वेळा तगादा लावत राहणे आणि निर्मात्याने पैसे दिले नाही तर जे नुकसान होईल ते सहन करण्याची तयारी.. कंपूमध्ये टिकून राहण्यासाठी करावे लागणारे लांगूलचालन.. त्यामुळे होणारा मन:स्ताप आणि मन:स्तापामुळे होणारे आजार.. एका पॉईंटला सगळे अस होतं. काहींचं नशीब चांगलं असतं किंवा त्यांना अशाही परिस्थितीत काम करत राहणं जमतं. ते टिकून राहतात.. ही स्पर्धा खूप रुथलेस आहे..!.. आपण एकमेकांशी बोलण्याची, एकमेकांना साथ देण्याची, एकमेकांचं ऐकून घेण्याची, एकमेकांना कुठे चांगली संधी असेल तर ती देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले. खरोखरच ही काळाची गरज आहे अन्यथा आगामी काळात यापेक्षा भयान स्थिती यायला वेळ लागणार नाही, असेच म्हणावे लागेल.