भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्य्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश संपन्न
मुंबई, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेस साथ देण्यासाठी उबाठा, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कागलचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक संजयबाबा घाटगे, गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीश घाटगे आणि मालेगावचे काँग्रेसचे माजी मंत्री (कै.) डॉ. बळीराम हिरे यांचे चिरंजीव प्रसाद हिरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. सीमा हिरे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदी उपस्थित होते.
नव्याने भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमुळे भाजपा सदस्य संख्या आणखी 50 लाखांनी वाढेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. बावनकुळे म्हणाले की, कागल व शहापूर च्या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे. मोठा राजकीय वारसा लाभलेले प्रसाद बळीराम हिरे आणि हजारोंच्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे. आरोग्य तसेच शिक्षण मंत्र्याची धुरा समर्थपणे सांभाळलेले तसेच दीर्घकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणा-या स्व. बळीराम हिरे ह्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर असून त्यांचे पुत्र आणि इतर कुटुंबियांच्या भाजपा प्रवेशामुळे आनंद झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख, श्रीरामपूरचे काँग्रेस नेते व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास विहाणी यांच्यासह 12 माजी नगरसेवक, आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इंद्रजित पडवळ, जिल्हा परिषद माजी सभापती निखिल बरोरा, फलटण चे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, तुषार गांधी, प्रसाद हिरे यांच्या पत्नी सौ. गीतांजली हिरे, नाशिक जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष बाजीराव निकम, रामराव शेवाळे, राजेंद्र लोंढे, अशफाक शेख, सुधाकर बाचकर यांचा भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांत समावेश आहे.