संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : मोदी, शहा, फडणवीस यांनी राजकारणात विष पेरण्याचे काम केले आहे. हे कधी देशाचे झाले नाहीत, तर महाराष्ट्राचे तरी कसे होतील? असा परखड सवाल करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राऊत म्हणाले की, शहा-मोदी हे महाराष्ट्र हिताचा विचार करीत नाहीत. भाजपचे हिंदुत्व नकली व तकलादू आहे. या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपने
राज ठाकरे यांना अडकवले आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणे या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. हा विषय फक्त इच्छेचा आहे. भाजप, मिंधे या लोकांना दूर ठेवले तर कुठलाही वाद उरत नाही. राज व उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या लोकभावनेची तुतारी फुंकली आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवा, एवढीच उद्धव ठाकरे यांची माफक अपेक्षा आहे.
अमित शहा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात कशी पुढे नेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिंदे व त्यांचे लोक हे मोदी-शहांचे मिंधे आहेत. फडणवीस यांच्या महाराष्ट्रप्रेमाचे ढोंग वारंवार उघडे पडले आहे. मुंबई या लोकांनी विकायला काढली व महाराष्ट्र लुटीचे ‘टेंडर’ काढले. महाराष्ट्र लुटीचे ‘टेंडर’ काढले ते अमराठी ठेकेदारांना दिले. धारावीच्या निमित्ताने संपूर्ण मुंबई गुजराती व्यापाऱ्यांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.