६ जण गंभीर जखमी, ५० जणांना वाचविण्यात यश
पुणे : प्रतिनिधी
रविवार, दि. १५ जून २०२५ पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ गेलेल्या पर्यटकांसाठी घातवार ठरला. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांत एका मुलाचाही समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यावेळी लोखंडी पुलावर १०० हून अधिक पर्यटक अल्याची माहिती आहे.
सुट्टीचा दिवस असल्याने इंद्रायणी नदीवरचा प्रसिद्ध कुंडमळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी केली होती. पण दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नदीवरचा हा कमकुवत पूल कोसळला आणि एकच हाहाकार उडाला. मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता. तसा बोर्डही साधारण दोन वर्षांपूर्वी प्रशासनाकडून लावण्यात आला होता. पण याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभिर्याने पाहिले, ना प्रशासनाने काळजी घेतली. अखेर ज्याची भीती होती, तेच रविवारी झाले. पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफच्या तुकड्या आणि इतर बचावपथके दाखल झाली आणि तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. दुर्दैवाने या दुर्घटनेत काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गिरीश महाजनांनी गर्दीमुळेच हा पूल कोसळल्याचे म्हटले. पण महत्वाची बाब ही की पूल जीर्ण झालेला असताना इथल्या प्रशासनाने इथून नागरिकांना ये-जा करण्याची परवानगी का दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या दुर्घटनेत अंदाजे २० ते २५ जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. पूल कोसळला, त्यावेळी पुलावर ५० ते १०० पर्यटक होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या ठिकाणी अग्निशमन दलही पोहोचले आणि अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आले. जवळपास ३८ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. पूल दुर्घटनेत ४ जणांचा बळी गेला तर अनेक जण जखमी झाले आहेत. अंधार पडल्यानंतर बचावकार्यात अडथळे येत होते. मात्र तरीही वाहून गेलेल्यांचा शोध सुरू होता. हा पूल जुना झाला हे माहीत असूनही, तशा सूचनाही देऊनही पुलाचा सुरू असलेला वापर हा झाला नागरिकांचा निष्काळजीपणा. पण पर्यटनस्थळ असलेल्या या गर्दीच्या ठिकाणी लक्ष न देणे, धोकादायक जुन्या पुलाची डागडुजी किंवा नवा पूल न उभारणं हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मृतांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी ५ लाखांची मदत
इंद्रायणी नदीवरील भीषण दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, काही जण लोखंडी पुलाखाली दबल्याचे सांगितले जात आहेत. जवळपास ३५ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.