पाकच्या क्षेपणास्त्र सरावाला भारताचे उत्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार पाकिस्तानच्या विरोधात मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. दुसरीकडे भारतातील हालचाली पाहून पाकिस्तानही भेदरला आहे. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने ग्वादर बंदराजवळ क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरु केला. दुसरीकडे भारतीय नौदलाने स्वदेशी आयएनएस विक्रांत समुद्रात तैनात केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आदेशावरून युद्धनौका समुद्रात उतरविण्यात आली. ओपन सोर्स इंटेलिजन्सने आयएनएस विक्रांतचे नौदल तळावरुन अरबी समुद्रात जातानाचे सॅटेलाईट इमेज समोर आणले आहेत. आयएनएस विक्रांतवर मिग-२९ फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर सज्ज आहेत. पहलागमच्या घटनेनंतर भारताच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्तानने ग्वादर बंदराजवळ क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरु केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून भारताने हे पाऊल उचलले आहे. तसेच भारतीय नौदलाने आयएनएस सुरतवरुन यशस्वी चाचणी केली. विशेष म्हणजे नौदलाने स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकाची यशस्वी चाचणीदेखील केली. आयएनएस विक्रांत कर्नाटकातील नौदल तळावरून अरबी समुद्रात जात असतानाचे फोटो उपग्रहांनी टिपले आहेत. लवकरच भारत राफेल विमानांची खरेदी करणार आहे.
पाकचा सराव, भारताचे प्रत्युत्तर
पाकिस्तानने अरबी समुद्रात युद्धाचा सराव सुरू केला. या सरावाला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आयएनएस विक्रांत हे विमानवाहू युद्धपोत समुद्रात उतरवले आहे. या युद्धपोतावर मिग-२९ लढाऊ विमाने आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.