राष्ट्रपतींनी दिली सरन्यायाधीशपदाची शपथ
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी ५२ वे सरन्यायाधीश म्हणून दि. १४ मे २०२५ रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना दि. १३ मे रोजी निवृत्त झाले. त्यानंतर (१४ मे) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली.. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत म्हणजेच सहा महिने दहा दिवसांचा असणार आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. भूषण गवई यांनी १६ मार्च १९८५ रोजी वकिली सुरू केली. १९९० नंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर भूषण गवई यांनी वकिली केली. १२ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनात्मक खंडपीठांचा ते भाग होते, ज्यांनी ऐतिहासिक निकाल दिले आहेत.
न्यायाधीश भूषण गवई हे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना नागपूर खंडपीठातही कार्यरत होते.. त्यादरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे पर्यटनासाठी गेले असताना तिथल्या परंपरेप्रमाणे बँड वादनाने त्यांना मानवंदना देण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना न्या. गवई यांनी ह्लमहाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठह्व नागपुरात स्थापन व्हावे यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, तसेच हजारो कोटींचा सिंचन घोटाळा या संदर्भातील न्यायालयीन खटल्यामध्ये त्यांनी कठोर भूमिका स्वीकारली होती. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी, विविध न्यायालयांमधील पायाभूत सुविधांच्या उभारणी संदर्भातही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून विशेष योगदान दिले होते आणि त्यासाठी विविध आदेशही पारित केले होते.