महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प करूया – बावनकुळे
नागपूर : शासनाच्या विविध उपयोजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रामुख्याने महसूल विभागाची आहे. त्यामुळे प्रशासनाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचा संकल्प आहे. लोकाभिमूख प्रशासन ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
नियोजन भवन येथे महसूल दिन व सप्ताहाचे उद्घाटन तसेच विविध उपक्रम व योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार परिणय फुके, चरणसिंग ठाकूर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महसूल अपर आयुक्त राजेश खवले, अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खाडे तसेच महसूल विभागातील विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
महसूल विभाग प्रशासनाचा चेहरा असल्याचे सांगत मंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की, प्रत्येक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या विभागाची आहे. त्यादृष्टीने विभागाच्या कार्यपद्धतीमुळे काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. राज्यात पारदर्शी प्रशासनाची सुरवात मंत्रालयापासून-गावापर्यंत सुरू झाली आहे. हीच भूमिका विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. महसूल विभागाचे सर्व प्रशासकीय प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिल्यामुळे 68 अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवड श्रेणी देवून त्यांना त्यांच्या पुढील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हे पद महत्त्वाचे असून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.