राज्य सरकारची तयारी, नगरविकास विभागाने केला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
मुंबई : प्रतिनिधी
बहुप्रतिक्षीत महापालिका, नगरपालिका निवडणुकीची तुतारी एकदाची फुंकली गेली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या हालचालींना सुरुवात झाली. नगरविकास विभागाने गुरुवारी महापालिका, नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे निवडणुका दिवाळीनंतर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शासकीय स्तरावरील या घडामोडींमुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग रचना पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान मुंबई महापालिका, राज्यातील अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते, असे समोर येत आहे. प्राप्त वेळापत्रकानुसार ९ टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. तर ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाणार आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर करतील. यानंतर निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्यासाठी काही कालावधी जाईल आणि नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणुका होतील.