सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे सुपुत्र, अरण्यऋषी नावाने प्रसिद्ध असलेले मारुती भुजंगराव चित्तमपल्ली यांचे आज बुधवारी सायंकाळी ७.५० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. वन खात्यात नोकरी करताना पक्षी, प्राण्यांचे अनेक बारकावे टिपले आणि त्यावर विपूल लेखन केले. एक प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अक्कलकोट रोडवरील ,सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि.१९ जून रोजी दुपारी १ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्यावर रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमीवर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. पुरस्कार स्वीकारण्यास ते दिल्लीला गेले होते. त्या प्रवासामुळे त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्न घेणे बंद केले होते. दिवसभरात ते तीन वेळा दूध घेत होते. बुधवारी सायंकाळी सायंकाळी त्यांनी अर्धा ग्लास पाणी प्राशन केले होते. त्यांच्या मृत्यूने सोलापूर शहर राज्यभरातून वन्यजीवप्रेमी, महान संशोधक महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. सोलापुरात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान मारुती चितमपल्ली यांनी भूषवले होते.
५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूरच्या मातीत जन्मलेल्या श्री.चितमपल्ली यांचे प्राथमिक शिक्षण भारतीय चौकातील टी. एम.पोरे विद्यालयात तर महाविद्यलयीन शिक्षण दयानंद कॉलेजात झाले.त्यांनी ३६ वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावली,या सेवेच्या काळात व निवृत्तीच्या काळात मिळून जवळपास ६५ वर्षे त्यांनी जंगल भटकंती केली.या साऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रवासातून त्यांनी स्वतःला घडवित-विकसित करीत साहित्याला व जगाला फार मोठी देणगी दिली आहे,त्यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या शब्दात वीस पुस्तके लिहून साहित्य समृद्ध केले,
विशेष म्हणजे मूळ तेलुगु भाषिक असलेल्या या दि ग्रेट माणसाने एक लाख नवीन शब्दाचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करुन दिला आहे,त्यांनी आयुष्यभर वने,वन्यजीव व्यवस्थापन,वन्यप्राणी व पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले आहे.खरेच त्यांचे कर्तृत्व हे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे.त्यांनी मराठीबरोबर संस्कृतचे अध्ययन केले असून जर्मन व रशियन भाषेचा अभ्यास केला आहे.
या साहित्यसेवा व कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.आतापर्यत त्यांनी अनेक साहित्य व अधिवेशनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत.२००६ साली सोलापुरात भरलेल्या ८३ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान चितमपल्ली यांना मिळाला होता. ९३ वा वाढदिवस साजरा करताना अरण्यऋषींची प्रकृती अगदी ठणठणीत तरुणाला लाजवेल अशी होती.
,शाकाहारी असलेल्या अरण्यऋषींचा दिनक्रम पहाटे ४ वाजता सुरु होत असे व्यायाम व नामस्मरणानंतर ९ वाजता नाष्टा, वृत्तपत्रे व इतर वाचन,दुपारी १ ते २ या दरम्यान भोजन, त्यानंतर ५ वाजेपर्यंत विश्रांती,सायंकाळी ५ ते ७ भेटीसाठी राखीव,रात्री १० वाजता भोजन व झोप लागेपर्यत वाचन.वेळेवर व्यायाम, शाकाहार,फळाहार व निसर्गाचे सानिध्य आदी बाबींचे तंतोतंत पालन हे अरण्यऋषींच्या ठणठणीत प्रकृतीचे रहस्य होते,कारण या वयातही त्यांचे केस काळे सर्व दात शाबूत होते,त्यांचे बोलणे-चालणे व्यवस्थित होते, ते चष्माशिवाय वाचन करु शकत होते हे विशेष.
ग्रंथालयाचे स्वप्न अपुरे…..
पद्मश्री कै.मारुतीराव चितमपल्ली यांचे भव्य ग्रंथालय सुरू करण्याचे स्वप्न होते,त्यासाठी त्यांच्या परिवाराने राहत्या घराजवळ हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथे दुमजली इमारत बांधली आहे,त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आगामी २-३ महिन्यात तेथे ग्रंथालय सुरू होणार होते,त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.त्यांच्याकडील ग्रंथ संपदा फार मोठी आहे,जवळपास दहा हजार ग्रंथापैकी अनेक दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत.त्यात त्यांनी लीहलेल्या अनेक पुस्तकांचा समावेश आहे.