तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण, विमानाने भारतात आणले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथक राणाला घेऊन भारतात पोहोचले. राणाला भारतात आणण्याची जबाबदारी एनआयएवर सोपविण्यात आली होती. आता तहव्वूर राणाची एनआयए मुख्यालयात चौकशी होणार आहे.
मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला २००९ साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती. आता त्याला भारतात आणण्यात आले. अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालवण्यात येणार आहे. अमेरिकेत खटला चालला असताना भारतात पुन्हा खटला का चालवता, असा सवाल तहव्वूर राणाने केला. मात्र भारताने राणाचा दावा खोडून काढत आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दाखला दिला. सोबतच राणावरील आरोप गंभीर असल्याने भारतातही खटला चालवू शकतो, असा दावा भारत सरकारच्या वकिलांनी अमेरिकन कोर्टात केला होता. त्यामुळे तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यात आले. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचे इस्रायलने स्वागत केले आहे.
तहव्वूर राणाला भारतात आणले. त्यानंतर पाकिस्तानने हात झटकले. राणा हा कॅनडाचा नागरिक आहे, त्याचा पाकिस्तानशी आता संबंध नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. राणाने गेल्या दोन दशकांपासून त्याच्या पाकिस्तानशी संबंधित कागदपत्रांचे नूतनीकरण केले नसल्याचा दावाही पाकिस्तानने केला. राणाच्या चौकशीतून पाकिस्तानचा पर्दाफाश होईल, असे कायदेतज्ज्ञ बोलत आहेत. पण त्याआधीच पाकने राणापासून फारकत घेतली.
२६/११ च्या हल्ल्यात हात
१९६१ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या तहव्वूर राणाने सुरुवातीला पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आणि त्यानंतर १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात तो कॅनडाला गेला. कॅनडाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर तो शिकागो येथे स्थायिक झाला. मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली. या हल्ल्यात १६० हून अधिक लोक मारले गेले. राणावर १२ गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता.