पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज पुण्यात निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंत नारळीकर यांनी विज्ञानातील अनेक बदल, नवे शोध जगापुढे मांडले. मुलांमध्ये विज्ञान रुजावे, यासाठी त्यांची खास तळमळ होती. विज्ञान सुलभ भाषेतून शिकवण्यासाठी ते साहित्याच्या पंढरीत रमले.
जयंत नारळीकर यांना पूर्वीपासूनच अंतरिक्ष, अंतराळाची ओढ होती. खगोल विज्ञानात त्यांचा पूर्वीपासून ओढा होता. त्यातूनच त्यांनी आकाशाशी नाते जोडले. पण विज्ञानातील या घडामोडी बालगोपाळांपासून अबालवृद्धांपर्यंत सहज आणि सोप्या भाषेत पोहचाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी लेखणीतून महाराष्ट्राला विज्ञान साक्षर करण्यासाठी लेखणी झिजवली. त्यांनी विज्ञान साहित्यविश्वाचे नवे दालनच उघडले नाही तर ते समृद्ध केले. पाश्चात्य देशातील लोकांमध्ये जसा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तसा आपल्याकडील लोकांचा असावा, ही त्यांची प्रांजळ भावना होती.
१९७९ मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांचा यक्षांची देणगी हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याने विज्ञान साहित्याच्या चौकटी बदलल्या. हॉयल-नारळीकर सिद्धांतामुळे त्यांच्याभोवती एक वलय तयार झाले. विज्ञान कथा लिहिताना त्यांनी बोजड, कंटाळवाणे वळण टाळले. उलट त्यात साहित्य विनोदाची पेरणी केली. त्यांच्या या पुस्तकांची मराठी तरुणाईलाच नाही तर आबालवृद्धांना भुरळ घातली. मराठी साहित्याला या विज्ञान कथांनी नवी उभारी आणि भरारीच दिली असे नाही तर महाराष्ट्राचा विज्ञानवादी दृष्टीकोन भक्कम होण्याचा पाया यामधून घातला गेला. घरातूनच त्यांना विज्ञानाचे बाळकडू मिळाले. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ होते तर आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले होते. तेथूनच त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली होती.
केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर जयंत नारळीकर भारतात परतले. आधी त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. २०२१ मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.