मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रीय असणारा पाऊस ब्रेक घेणार आहे. राज्यातील काही भागांत तुरळक ते मध्यम पाऊस पडणार आहे. परंतु संपूर्ण राज्यातून मोठा पाऊस ब्रेक घेणार आहे. १७ जुलैपर्यंत पाऊस सुटीवर जाणार आहे. तसेच २० जुलैनंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. सध्या राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप घेतली. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, विदर्भातील बराच भाग येथे मुसळधार पाऊस झाला. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले. धरणेदेखील तुडुंब भरली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मात्र, मराठवाडा कोरडाठाक असून, पाणी पातळी खोेलवर गेली आहे. त्यातच पहिल्या टप्प्यात पेरणी केल्याने कोवळी पिके माना टाकत आहेत.
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १७ जुलैपर्यंत पाऊस नसणार आहे. त्यानंतर जुलैच्या तिसर्या आठवड्यापासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब जुलै महिन्याच्या तिसर्या आठवड्यात अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात चार दिवस ऑरेंज आणि रेल अलर्ट कुठेही दिला नाही.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस
अंदामान निकोबार अन् केरळमध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. त्यानंतर राज्यात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. मे महिन्यात मान्सूपूर्व जोरदार पाऊस झाला होता. जून महिन्यात मराठवाडा, विदर्भ वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली. परंतु जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पाऊस झाला. विदर्भात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील सर्व भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली. आता काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, मराठवाड्यात पावसाने दडी दिल्याने कोवळी पिके संकटात सापडली आहेत. सध्या पावसाची गरज आहे. परंतु पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.