नवी दिल्ली : देशातील ५ मोठ्या बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली. पाच बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश आहे. त्यामुळे या पाच बँकांना मोठा धक्का मानला जात आहे.
देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेला आरबीआयने एकूण ९७.२० लाख रुपयांचा दंड ठोठावला. सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, केवायसी, क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल आयसीआयसीआय बँकेला हा दंड ठोठावण्यात आला. यासोबतच ऍक्सिस बँकेला आरबीआयने २९.६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑफिस खात्यांच्या अनधिकृत कामकाजाबाबत आरबीआयच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल ऍक्सिस बँकेला हा दंड ठोठावला.
आरबीआयने आयडीबीआय बँकेला एकूण ३१.८ लाख रुपयांचा दंड ठोठावला. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेती आणि संबंधित कामांसाठी दिलेल्या अल्पकालीन कर्जावरील व्याज अनुदानाशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल हा दंड ठोठावला. यासोबतच बँक ऑफ बडोदाला आरबीआयने एकूण ६१.४० लाख रुपयांचा दंड ठोठावला. बँकेत असलेल्या वित्तीय सेवा आणि ग्राहक सेवा काउंटरवर जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बीओबीवर दंड आकारला.
बँक ऑफ महाराष्ट्रला
३१.८० लाखांचा दंड
आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्रला एकूण ३१.८० लाख रुपयांचा दंड ठोठावला. केवायसीशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रला दंड आकारला आहे.