मोदींचा पाकला इशारा, आता फक्त पीओके, दहशतवादावरच चर्चा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाच्या विरोधात भारताचे नवे धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाच्या विरोधातील लढाईत एक वेगळी लाईन खेचली असून, आता भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर थेट उत्तर मिळणार, तेही आमच्या पद्धतीने आणि आमच्या अटींवर हे या ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे. जिथून दहशतवादी निर्माण होतात, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन कठोर कारवाई केली जाईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी यापुढे पाकिस्तानसोबत फक्त पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच चर्चा होईल, असे ठणकावून सांगितले.
भारत-पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटल्यानंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधी करार झाला. त्यानंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या या हल्ल्यात १०० हून अधिक खतरनाक अतिरेक्यांना ठार केले. दहशतवाद्यांचे अनेक प्रमुख गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानात जाहीरपणे फिरत होते. भारताविरोधात कट रचत होते. त्यांना भारताने एका झटक्यात ठार केले.
भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकरित्या उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती की, भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
या लढाईत मेड इन इंडिया शस्त्रांनी पाकिस्तानला आपली ताकद दाखवून दिली. हवाई हल्ले असो वा पर्वतीय प्रदेश, प्रत्येक ठिकाणी भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी त्याची क्षमता सिद्ध केली. भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीची याचना केली. तोपर्यंत भारताने आपले लक्ष्य साध्य केले होते. त्यामुळे आम्ही शस्त्रसंधी केली, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम
गेल्या काही दिवसांत आपण सर्वांनी देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले. सर्वप्रथम प्रत्येक भारतीयांच्या वतीने शक्तीशाली भारतीय सैन्य, गुप्तचर संस्था आणि शास्त्रज्ञांना सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी आपल्या शूर सैनिकांच्या अफाट शौर्याला सलाम करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतीय सैन्याचा पराक्रम
माता-भगिनींना समर्पित
आमच्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असीम शौर्याचे प्रदर्शन केले. मी त्यांच्या वीरतेला नमन करतो, त्यांचे धाडस, पराक्रम देशाच्या प्रत्येक माता, बहीण आणि मुलीला समर्पित करतो, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित
यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही. उलट त्यांच्यावर जोरदार कारवाई केली जाईल, असाही इशारा मोदी यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित करण्यात आले आहे, थांबविलेली नाही. यापुढे पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबविले नाही तर भारत पूर्ण शक्तीने हल्ला करेल, असेही मोदी म्हणाले.