महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण : मुख्यमंत्री, मुंबई ते नागपूर आता ८ तासांत प्रवास
मुंबई : प्रतिनिधी
नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास करणे आता शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर ८ तासांत पोहोचता येणार आहे. यानंतर आता शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झाला. २०१४ ला आम्ही जे स्वप्न बघितले, त्याची पूर्तता आज होत आहे. हा केवळ रस्ता नाही तर महाराष्ट्राचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. महाराष्ट्राचे २४ जिल्हे जेएनपीटीसोबत कनेक्टेड आहेत. ते वाढवण सोबत आम्ही जोडणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दुस-या टप्प्याचे, दादा भुसे यांनी तिस-या टप्प्याचे तर मी याच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करत आहे. या महामार्गावर ७३ पूल आहेत. वन्य जीवांना धोका पोचू नये, यासाठी अंडर पास आणि ओव्हर पास बनवले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेवटचा टप्पा ७६ किमी आहे. यामध्ये ५ जुळे बोगदे आहेत. हा सर्वात जास्त लांबीचा बोगदा आहे. ६० डिग्री तापमान झाल्यास आपोआप पाणी सुरू होते आणि तापमान कमी झाल्यास आपोआप बंद होते. हे सगळे बोगदे एकमेकांना जोडले आहेत. यात २०० मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याची तयारी आपण केली आहे. तसेच २२ ठिकाणी सुविधा केंद्र असतील. हा स्मार्ट रोड म्हणून विकसित करण्यात येत आहे. गेल कंपनीने संपूर्ण एक गॅस पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे जेवढे उद्योग या रस्त्याच्या बाजूला आहेत, तिथे गॅस पुरवला जाईल. गडचिरोली इथे स्टील उद्योगाला गॅस पुरवला जाईल. शिर्डी, अजिंठा अशी ट्रॅफिक १० लाख प्रतिमहिना सुरू आहे. ती आधी २ लाख होती. आता शेवटच्या टप्प्यामुळे यात अजून वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट
देशातील सर्वात लांब महामार्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट्स असलेल्या समृद्धी महामार्गाचा ४ था आणि शेवटचा टप्पा गुरुवार, दि. ५ जून २०२५ रोजी पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर आज अडीच वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्यात ७६ किमी इगतपुरी ते आमणे या रस्त्याचे लोकार्पण झाले.
गेमचेंजर प्रकल्प : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा देशातला सर्वांत जास्त लांबीचा आणि गेम चेंजर प्रकल्प पूर्ण झालेला आहे. सुरुवातीला काही लोक हा रस्ता होऊ नये, यासाठी प्रयत्न करत होते. आम्ही तो अत्यंत कमी कालावधीत तयार झाला. यामुळे आता १८ तासांचा प्रवास ८ तासांत पूर्ण होणार आहे, असे म्हटले.
राज्यासाठी मोठे काम : पवार
हा प्रकल्प सुरू होत असताना अनेकांनी विरोध केला. नंतर दर जाहीर केला, तेव्हा ज्यांनी विरोध करायला लावला, त्यांनी जाऊन पैसे घेतले. ५५ हजार ५०० कोटींची खर्च होता. पण बजेट ६१ हजारांवर गेले. १२ कोटी सिमेंट बॅग, ७ लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर झाला. तब्बल ६१ हजार कोटी रुपयांचा खर्च करुन ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे. हा महामार्ग म्हणजे राज्यासाठी फार मोठे काम झाले आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
समृद्धी महामार्ग
भ्रष्टाचाराचे कुरण : सपकाळ
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वत:ची वाहवा करून घेत आहे. परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला. यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.