७ टक्के वाढीचा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचा-यांना मूळ वेतनावरील महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार एसटी कर्मचा-यांना जून २०२५ पासून ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. महामंडळातील कर्मचा-यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा, तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांना मोफत प्रवास पास ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी देण्याचा निर्णयही शिंदे यांनी घोषित केला.
सह्याद्री शासकीय अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत महागाई भत्त्यासह संघटनांच्या विविध मागण्यांवर चर्चा होऊन काही मंजूर करण्यात आल्या. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. बैठकीत एसटीची उत्पन्न वाढ, इंधन बचत आदी मुद्यांवर चर्चा झाली.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचा-यांना ५ लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनादेखील सुरू करण्यात आली आहे. या दोनपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय कर्मचा-यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे शिंदे म्हणाले.
एसटीच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचा-यांना आणि त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटीतून मोफत प्रवास करण्याचा पास देण्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली. या निर्णयाचा लाभ सुमारे ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचा-यांना होणार आहे. या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजीत अडसूळ, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
एसटी कर्मचा-यांना
अपघाती विमा कवच
एसटी कर्मचा-यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचा-यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, अशा कर्मचा-यांना कर्तव्यावर असताना किंवा नसताना अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आले आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास एक कोटी रुपये , पूर्णत: अपंगत्व आल्यास एक कोटी, अंशत: अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.